बालक आणि पालक यांच्यात चांगली बॉण्डिंग निर्माण करण्याच्या ९ टिप्स

चांगले आई-वडील म्हणजे काय? आपण चांगले आईबाबा होऊन आपल्या मुलांचं संगोपन नीट करू का? अशा शंका वाटतात? मग हा लेख वाचा!

आई-बाबा होणं या सारखी दुसरी आनंदाची गोष्ट नाही. प्रत्येक जण आयुष्यात या क्षणाची आतुरतेने वाट बघत असतो, याबद्दल अनेक स्वप्न बघितलेली असतात.

खूप गोष्टी ठरवलेल्या असतात. आई-बाबा होणं जी गोष्ट आनंद तर देतेच त्यात तिळमात्र सुद्धा शंका नाही पण याचबरोबर येते ती एक जाणीव- जबाबदारीची जाणीव.

खरंतर जबाबदारी आली की प्रत्येकजण ती निभावून नेऊ शकतो.

पण तरी इतकी मोठी जबाबदारी स्वीकारायच्या आधी आपण त्यासाठी तयार आहोत का? काय बरोबर काय चूक?

म्हणूनच आज आम्ही खास अशा आईबाबांसाठी या टिप्स घेऊन आलोय म्हणजे त्यांना आपल्या नवीन जबाबदारीने भांबावून जायला होणार नाही.

आई बाबांनी हि त्यांची पालकत्त्वाचॆ जवाबदारी नीट सांभाळली, तर आपसूकचं मूल सुद्धा लहानपणापासून त्याचं शिक्षण, त्याचं एकंदरीत वागणं या जवाबदाऱ्या नीट पळू शकतं.

या टिप्स पैकी सगळ्या टिप्स एकाच वेळेस लागू होणार नाहीत, बाळ जसजसं मोठं होईल तशा यातल्या बऱ्याच टिप्सचं महत्व कळून त्याचा फायदा होईल.

१. मुलांसाठी चांगला आदर्श बना

मुलांना नुसत्या अमुक कर, अमुक करू नका म्हणून नुसत्या सूचना केल्या तर राग तर येतोच शिवाय त्यांना मुद्दामहून ती गोष्ट करावीशी वाटते.

मग जर आईबाबा नको म्हणत असतील तर ते या गोष्टी आईबाबांपासून लपून करतात.

यामुळे पालक आणि मुलांमधलं अंतर वाढतच जातं. उदाहरण द्यायचं झालं तर मुलांना कोल्डड्रिंक पिणं कसं वाईट असतं आणि त्यांना ते न देऊन आपण मात्र त्यांच्यासमोर ‘मोठ्यांना चालतं’ असं म्हणून पीत बसायचं असं करू नका.

यापेक्षा कोल्डड्रिंक वाईट असतं, म्हणून आपण सगळेच फळांचा रस पिऊ असं केलं तर?

मुलांसाठी आईबाबा हे पहिले गुरु असतात. ते आईबाबांकडे बघूनच लहानाचे मोठे होत असतात.

आईबाबांचंच अनुकरण करत असतात. कित्येकदा लहान मुलांना मोठं होऊन कोणासारखं व्हायचं असा प्रश्न विचारला तर त्यांचं उत्तर ‘आईसारखं’ किंवा ‘बाबांसारखं’ असं असतं.

त्यामुळे आपल्याला जे मुलांनी करायला हवं आहे तेच जर आपण केलं तर मुलं आपोआपच शिकतील.

२. मुलांचे लाड करा

बऱ्याच जणांचा असा गैरसमज असतो की मुलांचे खूप लाड केले तर ती बिघडतात.

पण लाड करणे आणि लाडावून ठेवणे यात फरक असतो.

मुलांच्या चुकांवर पांघरूण घालणे, त्यांना काय चूक काय बरोबर याची जाणीव करून न देणे,

त्यांचे सगळे हट्ट पुरवणे म्हणजे मुलांना लाडावणे आणि याऊलट मुलांना जवळ घेऊन त्यांना आपल्या त्यांच्यावरच्या प्रेमाची जाणीव करून देणे.

त्यांनी एखादी चांगली गोष्ट केली तर त्याबद्दल त्यांचं कौतुक करून त्यांना बक्षीस देणे.

त्यांना जवळ घेऊन गोष्टी सांगणे, मोठे होतील तसे बाहेर घेऊन जाणे, त्यांचं काही चुकलं तर त्यांना समजावून सांगणे.

चुकांची प्रेमाने जाणीव करून देणे, त्यांची बाजू ऐकून घेणे म्हणजे लाड करणे.

३. मुलांबरोबर भरपूर वेळ घालवा आणि त्यांना चांगल्या त्याच गोष्टी दाखवा:

कधी कुंभाराला मातीच्या गोळ्याला आकार देताना बघितलं आहे?

एक मोठा मातीचा गोळा असतो पण कुंभार त्यावरून प्रेमाने हात फिरवून, खूप कष्टाने त्याला आकार देतो आणि त्यातून सुंदर काहीतरी साकारतो.

मुलांचं सुद्धा असंच असतं. त्यांना वाढवताना जमतील तितके चांगले अनुभव आपण त्यांना दिले पाहिजेत.

लहानपणी बघितलेल्या गोष्टींचा मुलांच्या मनावर खूप खोलवर परिणाम होतो, बऱ्याचदा या लहानपणीच्या अनुभवांमुळे त्यांचं व्यक्तिमत्व विकसित होतं.

मोठ्या माणसांच्या वागणुकीची, त्यांच्या स्वभावाची मुळं ही लहानपणात असतात त्यामुळे आपल्याला मुलांना आपण नेहमी चांगलं तेच द्यायचा, दाखवायचा प्रयत्न केला पाहिजे.

त्यांच्यासमोर आईबाबांनी एकमेकांशी प्रेमाने वागलं पाहिजे, मुलांसमोर जोरजोरात भांडणं टाळायला पाहिजे.

मुलांना जेवढे सकारात्मक अनुभव आपण देऊ तेवढं त्यांच्या विकासाठी ते चांगलं हे लक्षात ठेऊन वागलं पाहिजे.

मुलांचं कधी काही चुकलं तर त्यांना त्याबद्दल शिक्षा देताना सुद्धा याबद्दल भान ठेवलं पाहिजे.

त्यांना त्यांच्या चुकांसाठी कोसत न बसता त्यातून शिकून पुढे कसं जात येईल हे शिकवायला हवं.

चुकांची जाणीव करून देणं गरजेचं आहेच, पण ते करताना त्यांना टोचून बोलणं, त्यांची बाजू ऐकून न घेणं, त्यांना एकदा चूक समजल्यावर सुद्धा वारंवार त्या गोष्टीची आठवण करून देणं या गोष्टी टाळल्या पाहिजेत.

४. मुलांसाठी मन मोकळं करायची हक्काची जागा व्हा

जगाच्या पाठीवर काहीही झालं, अगदी जग इकडचं तिकडे जरी झालं तरी तुम्ही तुमच्या मुलांसाठी कायम असणार आहात याची जाणीव मुलांना करून द्या.

त्यांच्याकडून कधी काही चुकलं तर त्यांच्या चुकांना पाठीशी न घालता त्यांना समजावून सांगा आणि वेळ पडली तर त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहा.

मुलांशी संवाद साधणं खूप गरजेचं आहे. त्यांच्याशी सतत बोलून त्यांना बोलतं ठेवलं पाहिजे.

त्यांच्याशी मोकळेपणाने संवाद हवा. त्यांना आईबाबांबद्दल इतका विश्वास वाटला पाहिजे की त्यांच्याकडून अगदी काही चूक जरी घडली तरी त्यांनी ती विश्वासाने येऊन आईबाबांना सांगायला हवी.

तसा संवाद जर मुलांमध्ये आणि आईबाबांमध्ये असेल तर हे अशक्य नक्कीच नाही, हो ना?

५. मुलांच्या समस्या ऐकून घ्या, संवाद साधा

प्रॉब्लेम्स काय फक्त मोठ्या माणसांनाच असतात का? तर नाही.

लहानग्या जीवांना सुद्धा खूप त्रास असतात पण ते ऐकून घेणारं, समजून घेणारं कोणी नसतं.

आपल्याकडे बऱ्याचदा असं सुद्धा होतं की कधी मुलांना काही प्रॉब्लेम असेल, ते ऐकत नसतील, त्यांच्या वागण्यात काहीतरी चुकत असेल तर आईबाबा थेट न बोलता नात्यातल्या कोणालातरी त्यांच्याशी बोलायला सांगतात किंवा गाऱ्हाणी सांगतात

यामुळे आईबाबा आणि मुलं यामध्ये संवादाची एक दरी पडते आणि नात्यातली सहजता हरवून जाते.

त्यामुळे आपल्या मुलांशी आपणच बोललं पाहिजे, ती आपली जबाबदारी आहे याचबरोबर त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या पाहिजेत.

दर वेळेस त्यांना त्यावर उपाय सुचवायला हवा असंही नाही.

आपल्याला जसा कधीकधी ऐकायला कान हवा असतो तसा त्यांनाही हवा असतो.

६. तुमचं स्वतःचं बालपण आठवा

मुलांकडून अवास्तव अपेक्षा ठेवताना आपण त्यांच्या वयाचे असताना कसे होतो, काय करत होतो याचं भान हवं.

साठ टक्के मिळवलेल्या आईबाबांना आपल्या पाल्याकडून नव्वद टक्क्यांची अपेक्षा असेल तर कसं चालेल.

याचबरोबर लहानपणी आपले आईवडील आपल्याशी कसे वागले, आपण लहान असतानाच्या त्यांच्या कोणत्या गोष्टी आपल्याला आवडायच्या, कोणत्या गोष्टींचा त्रास व्हायचा हे आठवून बघून आपण आपल्या आईबाबांच्या चांगल्या त्या गोष्टी घ्यायला हव्यात आणि चुकून जर आपल्याला लहानपणी आपल्या आईबाबांची खटकणारी एखादी गोष्ट जर आपल्याकडून आपल्या मुलांच्या बाबतीत होत असेल तर ती बंद करायला नाही का जमणार?

हे नक्कीच अवघड आहे, दर वेळेला ते जमेलच असं नाही.

पण प्रयत्न मात्र न कंटाळता सुरु ठेवले पाहिजेत. आपण लहान असताना आपल्या आईबाबांची अमुक गोष्ट आपल्याला आवडली नव्हती.

मग आपल्या मुलांना सुद्धा ती आवडणार नाही याची स्वतःला जाणीव करत राहिलं पाहिजे.

७. स्वतःकडे सुद्धा लक्ष द्या

बाळ झाल्यावर बरेच आईबाबा स्वतःकडे, स्वतःच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्याकडे, स्वतःच्या नात्याकडे दुर्लक्ष करतात.

आणि सगळं लक्ष बळावरच केंद्रित करतात. हे खरं आहे की बाळांना त्याची गरज असते पण आईबाबा जर हेल्दी असतील तरच ते बाळाचं संगोपन करून बाळाला हेल्दी करू शकतील नाही का?

त्यामुळे प्रत्येकाला स्वतःचा असा वेळ हवाच. यासाठी कधी कोणाची मदत जरी घ्यावी लागली तरी त्यात लाजण्यासारखं काही नाही.

वेळात वेळ काढून आईबाबांनी स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष द्यायला हवंच.

स्वतःला वेळ द्यायला हवा आणि एकमेकांना सुद्धा वेळ द्यायला हवा.

आईबाबांचं एकमेकांशी जर चांगलं नातं असेल तर त्याचा मुलांवर सकारात्मक परिणाम नक्की होतो.

मग यासाठी आठवड्यातून एकदा मुलांना आजीआजोबांकडे ठेऊन आईबाबा थोडावेळ फिरायला गेले तर काय हरकत आहे?

८. मुलांना मारू नका

हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. काहीही झालं, त्यांनी अगदी मोठी चूक केली आणि आपला संताप झाला, राग अनावर झाला तरी त्यांच्यावर हात उचलू नका.

अशाने मुलांच्या मनात भीती तर बसतेच, पुढच्या वेळेला काही लहानशी जरी चूक त्यांच्याकडून घडली तरी ते मग लपवायचा प्रयत्न करतात, खोटं बोलतात आणि मग संवाद म्हणजेच नात्याचा पाया ढासळून जातो.

यामुळे अजून एक होतं ते असं की त्यांच्या मानसिक विकासावर कायमचा परिणाम होतो.

त्यांना असं वाटायला लागतं मारून-मुटकून प्रश्न सुटतात त्यामुळे ते देखील चिडके व्हायची शक्यता असते.

जर कधी राग अनावर झाला तर शांत व्हायला वेळ घ्या, हवं तर मुलांशी काही काळ बोलू नका पण त्यांना मारून प्रश्न सुटणार नाही हे कायम लक्षात ठेवा.

९. तुमच्या मुलांकडून काय अपेक्षा आहेत? त्या साठी तुम्ही काय करता याचा विचार करा

सगळ्या आईबाबांना आपलं मूल शहाणं व्हावं, चार लोकांनी त्याचं कौतुक करावं असं वाटत असतं.

शाळेत चांगले मार्क हवेत, प्रेमळ हवं, खरं बोलणारं हवं, भांडखोर नको, सगळ्या भाज्या खाणाऱ्या हवं आणि अशी ही यादी वाढतंच जाते पण आईबाबा म्हणून यात आपण काय करतो याचा विचार करायला हवा.

मुलांना वेळ देऊन त्यांना अशा काही गोष्टी सांगून खरं बोलण्याचं, न भांडण्याचं महत्व समजावून देतो का?

त्यांनी सगळ्या भाज्या खाव्यात यासाठी काही नियम केलेत का?

त्यांनी त्यांच्या नावडीची भाजी खाल्ली की त्यांना त्याचं बक्षीस म्हणून त्यांच्या आवडीचं काही करून देतो का?

त्यांचे मार्क सुधारावेत यासाठी त्यांचा अभ्यास घेतो का?

मुलांकडून अपेक्षा ठेवताना त्यामागे आपले कष्ट असतात, ते आपण घेतले पाहिजेत.

शेवटी प्रत्येक मुल हे वेगळं असतं. ‘One size fits all’ असं काही नसतं त्यामुळे हे काही मुलांना वाढवायचे नियम नाहीत.. हे फक्त मार्गदर्शन आहे.

प्रत्येक आईबाबा आणि मुलांची जोडी ही वेगळी असते, प्रत्येकाचं नातं वेगळं असतं ते आपलं आपल्यालाच घडवायचं असतं, या फक्त काही टिप्स आहेत ज्यामुळे आईबाबा आणि मुलं सगळ्यांसाठीच हा प्रवास सुखकर होईल.

अशाच काही गोष्टी तुम्ही सुद्धा तुमच्या मुलांच्या बाबतीत फॉलो केल्या असतील.

त्या कंमेंट्स मध्ये सांगायला विसरू नका. आणि लेख आपल्या मित्र मैत्रिणींना शेअर करा.

Image Credit: theaustralian.com.au

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

2 thoughts on “बालक आणि पालक यांच्यात चांगली बॉण्डिंग निर्माण करण्याच्या ९ टिप्स”

    • नमस्कार! मनाचेTalks मध्ये आपले मनस्वी स्वागत. हे फेसबुक पेज 𝑴𝒐𝒕𝒊𝒗𝒂𝒕𝒊𝒐𝒏 𝒇𝒐𝒓 𝑮𝒐𝒐𝒅 𝑳𝒊𝒇𝒆 ❤️ या 𝑷𝒂𝒔𝒔𝒊𝒐𝒏 साठी आहे.

      मनाचेTalks च्या सर्व पोस्ट न चुकता न्यूज फीड मध्ये दिसण्यासाठी पोस्टच्या वरच्या उजव्या कोपऱ्यावर असलेले तीन डॉट्स वर दाबून ‘Add मनाचेTalks to Favourites’ यावर क्लिक करा…

      #मनाचेTalks च्या लेखांचे अपडेट्स मोफत मिळवण्यासाठी 👇

      व्हाट्स ऍप इन्व्हाईट लिंक.👇

      https://chat.whatsapp.com/I6p7m8Cruee4otE6qRWJoE

      टेलिग्राम चॅनल👇

      https://t.me/manachetalksdotcom

      मनाचेTalks फेसबुक पेज:

      https://www.facebook.com/ManacheTalks/

      मनाचेTalks हिंदी फेसबुक पेज:

      https://www.facebook.com/ManacheTalksHindi/

      Reply

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय