राणी पद्मावती

Rani Padmavti

मागे मी पद्मावती बघु नका, असं आवाहन करणारी पोस्ट माझ्या फेसबुक वॉलवर टाकली होती, तेव्हा आमची एक मैत्रीण लगेच इनबॉक्स मध्ये म्हणाली की अरे, असलं काय लिहतोयस हे? मी तर पद्मावतीची वाट पाहतेय, खुप छान ड्रेसींग, ज्वेलरी आणि भव्यदिव्य सेट्स आहेत., माहीतीये?…..

मी मनात म्हण्टलं, आनंद आहे, जा, खुशाल बघ की पद्मावती, मी अडवणारा कोण? पण बघताना खरा इतिहास विसरु नकोस, म्हणजे झालं, कारण जे पडद्यावर दाखवलं ते सगळचं खरं नसतं…..

आणि मॅडम, जे लोक इतिहास विसरतात, त्यांचं भविष्य धोक्यात असतं..

आधी पद्मावती कोण होती, आणि अल्लाउद्दिन खिल्जी कोण होता ते नीट माहित करुन घे आणि खुशाल जा, पिक्चरची मजा लुटायला!…

आपला काका व सासरा असणाऱ्या आणि दिल्लीच्या गादीवरील खिलजी राजवंशाचा संस्थापक असणाऱ्या जलालुद्दिन खिलजीचा कपटाने आणि अतिशय क्रूरपणे खून करुन, त्याचे मुंडके भाल्याच्या टोकात खूपसून पूर्ण सैन्यातून मिरवून, त्यानंतर आपले भाऊ व साल्यांचे मुडदे पाडून २१ ऑक्टोबर १२९६ रोजी अल्लाउद्दीन खिलजी दिल्लीश्वर झाला.

हजारोंचा नरसंहार केला, लाखोंचे धर्मपरिवर्तन केले,कोट्यवधींच्या संपत्ती व हत्ती-घोड्यांची लूट केली आणि आमच्या अगणित माताभगिनींचा शीलभंग करुन त्यांना आपल्या जनानखान्यात भरती केले वा बाजारात विकण्यास्तव गुलाम बनवून नेले.

इतिहासकारांच्या लेखण्यांना लिहीतानाही लाज वाटेल इतके रानटी व सैतानी अत्याचार अल्लाउद्दिन व त्याच्या सैनिकांनी आम्हां भारतीयांवर केले.

अल्लाउद्दिन दिल्लीच्या गादीवर असतांना मेवाडात रावळ वंशाचा राणा रतनसिंह गादीवर होता व चित्तोडगड ही त्याची राजधानी होती, रतनसिंह आपल्या प्रजाहितदक्ष राज्यकारभारासाठी आणि पद्मिनी आपल्या रुपासाठी विश्वविख्यात होते.

रतनसिंहाच्या दरबारी राघव चेतन नावाचा एक कलाकार होता. कसल्यातरी गुन्ह्यासाठी राज्याने राघव चेतनला अपमानित करुन दरबारातून हाकलून दिले.

त्याने अल्लाउद्दीन खिल्जीजवळ राणी पद्मिनीच्या अनुपम सौंदर्याचे रसभरित वर्णन करुन सांगितले की,”तुझ्यासारख्या पराक्रमी पुरुषाच्या जनानखान्यात पद्मिनी नसणे हा तुझ्या पराक्रमाचा अपमान आहे.” हे ऐकून पद्मिनीसाठी खिलजीने जानेवारी १३०३ मध्ये चित्तोडगडावर स्वारी केली व गडाला वेढा घातला.

राजपूतांच्या चिवट प्रतिकारामुळे आठ महिने होऊनही खिलजीला काहीच यश मिळत नव्हते. तेंव्हा त्याने रतनसिंहाकडे निरोप पाठवला की ,”मला जर राणी पद्मिनीचे दर्शन करविण्यात आले, तर मी दिल्लीला निघून जाईन.” त्याप्रमाणे खिलजीला पद्मिनीचे प्रतिबिंब दाखवण्यात आले अन् कपटी,लंपट खिलजी राणीचे रुप पाहून आणखीनच चेकाळला. ‘अतिथी देवो भव’ या भारतीय मूल्याचे पालन करण्यास्तव रतनसिंह गडाच्या दरवाजापर्यंत गेला.

मात्र खिलजी व त्याच्या सैनिकांनी कपटाने राजाला कैद करुन खाली आपल्या पाडावात नेले आणि निरोप पाठवला की ,”राणा जीवंत हवा असेल तर पद्मिनीला आमच्या स्वाधीन करा.”

गडावर सैनिकी खलबतं झडलीत. आणि गडावरुन निरोप गेला की, “राणी पद्मिनी तिच्या पन्नास दासींसमवेत अल्लाउद्दिनच्या डेऱ्यात दाखल होईल, पण त्याबदल्यात राणा रतनसिंहास सोडून देण्यात यावे.”

ठरल्याप्रमाणे राणी व तिच्या दासी एका-एका पालखीत व त्या पालखी उचलणारे चार-चार पालखीचे भोई खिलजीच्या डेर्यात दाखल झाले.राणी पद्मिनीची पालखी खिलजीच्या शामियान्यासमोर थांबली.

राणा रतनसिंहाला मोकळे करुन घोड्यावर बसवण्यात आले. पद्मिनीच्या पालखीतून एक स्त्री उतरली.अन्य पन्नास पालख्यांतून पन्नास दासीही उतरल्या. संकेत झाला. आणि….आणि हे काय?

बादल व अन्य राजपूत सैनिक आपल्या राजाला घेवून झपाट्याने गडावर निघून गेले अन् खिलजी हात चोळत राहिला.

आता मात्र झालेल्या प्रकाराने डिवचलेला हा विषारी भुजंग त्वेषाने चालून गेला. काही दिवस गड झुंजविल्यानंतर गडावरील रसद संपत आली आणि अंतिम युद्धासाठी राणा रतनसिंह व राजपूत वीर सिद्ध झाले.

२५ ऑगस्ट १३०३ रोजी गडाचे दरवाजे उघडून, ‘जय एकलिंग,जय महाकाल’ चे नारे देवून राजपूत सेना खिलजीच्या सेनासागराशी भिडली. परंतु संख्याबळात कमी असल्यामुळे लढाईचा अपेक्षितच निर्णय आला.

दहा-दहा सुल्तानी सैनिकांना लोळवून एक-एक राजपूत रणभूमीरुपी मातेच्या चरणी अर्पण होवू लागला. लढाई संपली. राजासहित सर्व राजपूत मारल्या गेले. अन् वखवखलेले सुल्तानी लांडगे आपल्याला सोळा हजार राजपूत जनानींची शिकार करायला मिळणार, म्हणून गडात घुसले.

पण गडावर शिरताच पाहतात तर काय, एकही स्त्री दिसेल तर शपथ. थोडे पूढे जावून चित्तोडगडावरील जगप्रसिद्ध ‘विजयस्तंभ’ ओलांडल्यावर लागणार्या विस्तीर्ण मैदानावर, जिथे आज ‘जौहर स्थल’ म्हणून पाटी लागलेली आहे, तिथे जावून पाहतात तर काय, अग्निज्वाळा आकाशाला भिडताहेत.

राजपूतांच्या पराभवाची वार्ता मिळताच, खिलजीचे सैन्य गडावर शिरण्यापूर्वीच राणी पद्मिनी व सोळा सहस्र वीरांगनांनी ज्या अग्निसाक्षीने आपल्या प्राणनाथांना वरले होते, त्याच अग्नित उड्या घेतल्या.स्वतःच्या शीलाचे व देव,देश अन् धर्माचे रक्षण करण्यास्तव या सोळा हजार तेजस्वी अग्निशलाका अग्नितच जळून भस्म झाल्यात.

आईला मुलींच्याच रक्ताचा अभिषेक घडला. रणभूमीला रणरागिणींच्याच देहाच्या माला अर्पित झाल्या अन् चित्तोडगडाने अनुभवला एक अलौकिक सोहळा, ‘जोहाराचा सोहळा’. तसे चित्तोडगडाने यानंतरही दोन मोठे जोहार अनुभवलेत, पण हा जोहार युगानुयुगे या देशाला प्रेरणा देणारा ठरला.

लढाई संपल्यावर सुमारे ३०,००० निष्पाप नागरिकांची अल्लाउद्दिनने कत्तल केली,असे त्याच्याच दरबारातील लेखक अमिर खुस्रोने लिहून ठेवलेय. तसेही प्रत्येक युद्ध आटोपल्यावर तेथील निःशस्त्र व निष्पाप नागरिकांची कत्तल करुन, त्यांच्या मुंडक्यांचे पहाड रचून त्यापुढे बसून मदिराप्राशन करणे, हा अल्लाउद्दिनचा आवडता छंद होता,असे म्हणतात आणि म्हणूनच अशा क्रूर,रानटी श्वापदाचे थोडेही महिमामंडन भारतीय जनमानस कधीही स्वीकार करु शकत नाही.

पद्मावती बघायचा का नाही ते तुम्हीच ठरवा पण खालील ओळीमध्ये असलेला ज्वलंत इतिहास मनावर कोरुन ठेवा, म्हणजे झालं….

ये हैं अपना राजपूताना,नाज इसे तलवारोंपे
इसने सारा जीवन काटा बरची-तीर-कटारोंपे ।
ये प्रतापका वतन बना हैं आजादी के नारोंपे
कूद पडी थी यहाँ हजारों पद्मिनीयां अंगारोंपे ।।
गूंज रहीं हैं कण-कण से कुर्बानी राजस्थान की
इस मिट्टी से तिलक करों,ये धरती हैं बलिदान की।।

(लेखाचा संकलित अंश – डॉ. सचिन जांभोरकर, नागपुर यांच्या सौजन्याने)

वाचण्यासारखे आणखी काही…..

Low Cost Housing – बांधकामाची किंमत कमी कशी कराल?
श्रीदेवी!! कॅमेऱ्या पलीकडची…….
मेडीटेशन – तेरा ध्यान किधर है?…मेडीटेशन – तेरा ध्यान किधर है?…

Manachetalks

'रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

'रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!