आनंदी व्यक्ती या 7 गोष्टी आवर्जून रोज सकाळी करतात

आयुष्याचा एक नवा करकरीत दिवस मिळतो तेंव्हा सकाळी उठून असा विचार करा की, आजचा हा एक नवा दिवस ही तुम्हांला मिळालेली भेट आहे.

तुम्हाला मिळालेले श्वास, तुमचं आरोग्य, तुमचे विचार, तुमच्या कडे असणा-या गोष्टी या किती खास, किती विशेष कितीतरी महत्वाच्या आणि कितीतरी अमूल्य आहेत….

त्याचबरोबर एक नवा अनमोल दिवस तुमच्या खात्यात जमा होतोय याची खात्री बाळगा.

प्रत्येक दिवस उत्तम पद्धतीने उभा राहावा असं तुम्हाला जर वाटत असेल तर सकाळीच त्याचा उत्तम पाया तुम्हाला घालता आला पाहिजे.

सकाळचा वेळ तुम्ही कशा पद्धतीने वापरता यावर तुमचा दिवस कसा असेल हे ठरतं.

खरंच एक नवा दिवस, एक नवी संधी !

आयुष्य सावरण्यासाठी आणखीन एक संधी हा येणारा प्रत्येक नवा दिवस घेऊन येतो. ज्या व्यक्ती निरोगी आणि आनंदी असतात ते या संधीचा फायदा नक्कीच उठवतात.

अतिशय प्रभावी पद्धतीने त्यांचा सकाळचा वेळ सत्कारणी लावतात ज्यामुळे त्यांच्या आयुष्यात लक्षणीय फरक पडतो.

अशा व्यक्ती नेमकं काय करतात ते एकदा समजून घ्या म्हणजे तुमच्या आयुष्यात ही तुम्हांला चांगले बदल घडवता येतील.

1) आनंदी व्यक्ती कृतज्ञतापूर्वक जागे होतात.

नेमकं सांगायचं तर आनंदी व्यक्ती दिवसाची सुरुवात करताना मनात आणि हृदयात प्रेमाची भावना जपतात.

त्या व्यक्तींना आयुष्यात त्यांना मिळालेल्या प्रत्येक गोष्टीची किंमत असते, जाणीव असते त्या गोष्टी त्यांंनी आनंदानं स्वीकारलेल्या असतात.

सकाळच्या वेळी आयुष्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणं अशा प्रकारची सवयच लावून घ्यायला आनंदी व्यक्ती कधीच विसरत नाहीत.

ज्या लोकांविषयी आत्मीयता आहे त्यांच्याशी थेट बोलण्यासाठी ते वेळ काढतील. त्यांची सर्वतोपरी काळजी घेतील.

परिस्थितीची जाणीव झाल्यानंतर ती आहे तसे स्वीकारण्याचा मोठेपणा त्यांच्यात असतो.

जी व्यक्ती आयुष्यात मिळालेल्या मौल्यवान वस्तू विषयी जितकी जास्त कृतज्ञ असते तितकी ती कमी उदास असते, निराशा तिच्या आजूबाजूला ही फिरकत नाही आणि ती व्यक्ती एकाकी पडण्याची तर अजिबात शक्यता नसते.

सुदृढ शरीर, उबदार घरं अशा अनेक असंख्य मौल्यवान गोष्टी तुम्हाला मिळालेल्या आहेत.

त्याविषयी तुम्ही नेहमीच आभार माना.

तुम्हाला मिळालेल्या गोष्टींचा जितका जाणीवपूर्वक विचार कराल तितके तुम्ही आनंदी व्हाल.

2) आनंदी व्यक्ती नव्याने सुरुवात करतात.

एखाद्या कलाकाराला भली मोठी रांगोळी रेखाटताना तुम्ही कधी पाहिलं आहे का?

या मोठ्या रांगोळीतील अगदी सुरुवातीची छोटीशी रेष जरी चुकली तर कलाकार नाराज होत नाही तर ती रेष अलगद पुसून पुन्हा हवी तशी रेषा व्यवस्थित काढतात. त्यामुळेच रांगोळी सुंदर आणि परिपूर्ण होते.

आनंदी व्यक्ती सुद्धा प्रत्येक दिवसाला असं नवं काहीतरी करण्याचा प्रयत्न करत असतात.

आधल्या दिवशी काही गोष्टी मनासारख्या घडल्या नसतील, काही चुका झाल्या असतील तर त्या पुसून, आज आपलं आयुष्य पुन्हा सुंदर करण्यासाठी आणि नव्या गोष्टी रेखाटण्यासाठी सरसावतात.

आनंदी जीवनासाठी एक मंत्र कायम लक्षात ठेवा, आत्ताचा क्षण आहे तो जगून घ्यायचा आहे.

भूतकाळातही रमायचं नाही आणि भविष्याच्या स्वप्नातही हरवायचं नाही.

आजचा दिवस, आजचा क्षण हाच खरा, आणि त्याची सुरुवात सकाळी करायची.

आजची सकाळ ही नवी फ्रेश, ताजी टवटवीत आहे. ती एन्जॉय करा.

सकाळी उठल्यानंतर भूतकाळाच्या चुका उगाळत बसू नका, तर आजचा दिवस फ्रेश कसा करता येईल? याकडे लक्ष द्या.

आयुष्याला आकार देण्यासाठी आज काय करता येईल? याचा आवर्जून विचार करा.

3) नव्या दिवसाचा अर्थ शोधतांना आनंदी व्यक्ती स्वतःकडे पुर्ण लक्ष देतात.

आनंदी व्यक्ती उठल्याउठल्या स्वतःला आरशात न्याहाळतात आणि विचारतात आज माझ्या आयुष्यातला शेवटचा दिवस असेल तर मी काय करेन बरं?

हा प्रश्न आजच्या दिवसातला प्रत्येक क्षण किती महत्वाचा आहे याची जाणीव करून देतो.

त्याच बरोबर आजच्या दिवसात काय काय करायचं हे ठरवताना तीन प्रश्न सुद्धा आनंदी व्यक्तीचा दिनक्रम ठरवायला मदत करतात.

हे तीन प्रश्न असे आहेत

  • माझा आजचा दिवस कोणत्या कारणामुळे अविस्मरणीय ठरेल?
  • आज प्रामाणिकपणे माझं कर्तव्य पूर्ण करता येईल ना?
  • सकारात्मक बदल घडवण्यासाठी मी आज नेमकं काय केलं पाहिजे?

या प्रश्नांची उत्तरं, अर्थपूर्ण दिवस घडवण्यासाठी आनंदी व्यक्तींना मदत करतात.

4) सकारात्मक गोष्टींचं सातत्यानं वाचन.

आयुष्यात सुखी असणा-या, आनंदी व्यक्ती पहा.

नित्यनेमाने ती व्यक्ती श्रद्धापूर्वक एखाद्या ग्रंथाचं नियमित वाचन करत असेल.

आजूबाजूला काय घडत आहे याची माहिती घेत असेल आणि आपलं ज्ञान वाढवण्यासाठी आवर्जून वाचत ही असेल.

अशा प्रकारे दिवसाची सुरुवात झाल्यामुळे त्या व्यक्तीचा दिवस सकारात्मक पद्धतीने ठराविक काम उत्तम रित्या पूर्ण होऊनच संपतो.

दिवसभर अगदी एनर्जेटिक वातावरण ही असतं.

मित्रांनो तुमच्या आयुष्याचा मार्ग तुम्हांला ठरवायचा असतो.

त्याच्यासाठी सगळ्या गोष्टींचं ज्ञान असणं फार महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी वाचन हे महत्त्वाचं ठरतं.

त्यामुळे वाचनाकडे किंवा ज्ञानाकडे अजिबात दुर्लक्ष करू नका.

5) आनंदी लोक प्रभावी वेळापत्रक पाळतात.

आनंदी, निरोगी लोकांना माहिती असतं की कामं वेळच्या वेळी पूर्ण केली तर ताण निम्मा कमी होतो.

त्यासाठी तुमच्या दिवसाची सुरुवात आनंदी, ऊर्जायुक्त आणि गतिमान असली पाहिजे.

एका ठराविक वेळापत्रकानुसार तुमचा दिवस आरामदायी तर होतोच पण तुम्हाला वेळेचं पूर्ण स्वातंत्र्य अनुभवता येतं.

एकदा का तुमचं वेळापत्रक पक्कं झालं की गार चहा गिळून न टाकता त्यातल्या आल्याच्या स्वादाची मजा आणि गरमागरम चहा तुम्ही अनुभवू शकता.

सकाळ शांतपणे अनुभवण्यासाठी दोन गोष्टी आवर्जून करा

A) आदल्या रात्री तुमच्या दुसऱ्या दिवसाच्या सकाळचं व्यवस्थित नियोजन करा.

ब्रेकफास्ट काय असेल? कपडे कोणते घालायचे? आणि कोणतं काम आधी करायचं? हे ठरवा.

विशेषतः सर्व महिलांना या सवयीचा मोठा फायदा होतो.

B) दुसरं महत्त्वाचं म्हणजे सकाळचं वेळापत्रक सुटसुटीत असलं पाहिजे, त्यात सतत टोकाचे बदल करू नका किंवा ते फारसं अवघड त्रासदायक ही करू नका.

6) आनंदी लोक पौष्टिक नाश्ताचा पर्याय स्वीकारतात.

सकाळची वेळ ही फार महत्त्वाची असते. तिचं काळजीपूर्वक नियोजन केलं पाहिजे.

त्यासाठी पौष्टिक नाश्ता करायला वेळ राखून ठेवणं गरजेचे आहे.

आधी तयारी केली असेल तर हा हेल्दी ब्रेकफास्ट तयार करायला आणि शांतपणे खायला वेळ पुरेसा ठरतो.

त्यामुळे तो दिवस तुमचा आरोग्यदायी ठरतो. आणि असे अनेक उत्तम आरोग्यदायी दिवस तुम्हाला एक निरोगी जीवन प्रदान करतात, हे लक्षात ठेवा.

दिवसाची सुरुवात केवळ चांगलीच नाही तर उत्तम करा.

झटपट नाष्टाचा पर्याय निवडू नका, तर हेल्दी पर्याय निवडा, आणि शरीराला पोषक इंधन उपलब्ध करून द्या.

7) आनंदी व्यक्ती उत्साहानं महत्त्वाच्या गोष्टींना प्राधान्य देतात.

माणूस म्हणून जगताना आपली काही उद्दिष्टं असतात.

नेहमी पुढे जात रहायला आपल्याला आवडतं. एखादे ध्येय गाठल्यानंतर एक मानसिक समाधान मिळतं.

म्हणूनच तर ज्या आनंदी व्यक्तींना तुम्ही ओळखता त्या व्यक्ती यशस्वी सुद्धा असलेल्या तुम्हाला दिसून येईल.

यश ही कोणतीही वस्तू नाही की जी बाजारात जाऊन विकत घेऊन घरात आणून ठेवता येते.

तर यश हा अनुभव आहे. हा अनुभव घेण्यासाठी सकाळी उठल्यानंतर लवकरात लवकर सक्रिय व्हा.

यशाचा मार्ग सकाळीच ठरवा आणि दिवसभर त्याच्यावरून वाटचाल करा .

आयुष्यात अनेक गोष्टी घडत असतात.

त्यातल्या कोणत्या गोष्टीला महत्त्व द्यायचं, उर्जा द्यायची हे तुम्ही एकदा पक्कं ठरवा.

बऱ्याच व्यक्ती तुम्ही अशा बघता की ज्या अनेक कामं अगदी सहज पद्धतीने हातावेगळी करत असतात.त्यांचा कुठंही गोंधळ नसतो.

तर बऱ्याच लोकांचं काय होतं की फोकस कोणत्या गोष्टीवर करावा याचा त्यांना अंदाज घेत नसल्यामुळे त्यांची कामं उरकत नाहीत आणि तणाव वाढत जातो.

जास्त महत्वाची काम कोणती हे ठरवून ती पहिल्यांदा व्यवस्थित पद्धतीने पूर्ण करता आली तर तुम्ही अधिक कार्यक्षम होऊ शकता.

एखादी गोष्ट करण्याची खरंच गरज आहे का? याचा विचार केला तर महत्त्वाच्या गोष्टींना अग्रक्रम मिळतो.

आणि हो या साऱ्यांमध्ये खळखळून हसता ना?

खळखळून हसणं हीच तर आनंदाची, यशाची, आरोग्याची गुरुकिल्ली आहे.

तुम्ही तुमच्या आयुष्यात नेमके कोणते बदल घडवलेत ज्यामुळे तुमची सकाळ प्रसन्न झाली हे आम्हाला कमेंट मध्ये जरूर कळवा.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठीयेथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

1 thought on “आनंदी व्यक्ती या 7 गोष्टी आवर्जून रोज सकाळी करतात”

  1. रोज पहाटे लवकर ऊठुन मोकळ्या हवेत फिरायला जाण्याची सवय लावली त्या प्रवासात जाताना मला लाभलेल्या सुखकारक, आनंदी जीवनाबद्धल परमेश्वराजवळ कृतज्ञता व्यक्त करून त्याचे आभार मानतो, स्वतःला स्वयं सुचना देतो आणि परतीच्या प्रवासात आर जे कार्तिक, ग्यान वत्सल स्वामी, गौर गोपाल दास, डॉ. उज्वल पाटणी, विवेक बिंद्रा, संदीप माहेश्वरी, सोनू शर्मा, विनोद मिस्त्री, शिवानी दीदी या महान व्यक्तीचे विचार आलटून पालटून ऐकतॊ कधी कुकू एफ, यश या वर इंग्रजी पुस्तकं मराठी अनुवाद केलेले आहेत त्याचे समरी ऐकतो, ऐतिहासिक कादंबरी -युगपुरुष, श्रीमान योगी, स्वामी, राधेय, मृत्युजंय, पानिपत ऐकतो वाचनालयातून आणून वाचतो अशा सुंदर सवयी स्वतःला लावल्यामुळे माझी सकाळ, पूर्ण दिवस ताण रहीत, आनंदात जातो.

    Reply

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय