पुण्याच्या इंजिनिअरनं विकसित केलं घरच्या घरी गॅस तयार करण्याचं नवं तंत्रज्ञान

पुण्याच्या इंजिनिअरनं विकसित केलं घरच्या घरी गॅस तयार करण्याचं नवं तंत्रज्ञान, बघा तुम्हालाही कसे हे करता येईल
घरच्या ओल्या कचऱ्यापासून गॅस बनवणा-या “वायु मॉडेलचा” ३०० घरात होतोय वापर.
अमेरिकेतील अशोका चेंजमेकर या संस्थेचा ग्रीन स्क्रील इनोव्हेशन चॅलेंज पुरस्कार जिंकणारे, पुण्याचे इंजिनिअर प्रियदर्शन सहस्त्रबुद्धे.
प्रियदर्शनने घरातल्या ओल्या कचऱ्यापासून स्वयंपाकाचा गॅस तयार करण्याचं सुधारित तंत्र विकसित केलंय.
IIT बॉम्बेमधून मेकॅनिकल इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलेल्या प्रियदर्शनने घरातून तयार होणाऱ्या ओल्या कचऱ्याचं बायोगॅसमध्ये रुपांतर करण्यासाठी एक सिस्टीम तयार केली आहे या सिस्टीमचं नाव आहे ‘वायू’.
आज पुण्यातल्या स्वारगेट जवळच्या कॉलनीत ३०० घरांमध्ये हा बायोगॅस वापरला जातोय.
एलपीजी गॅसच्या किंमती वाढत असताना असा घरच्या घरी गॅस तयार करणं खरचं शक्य आहे का?
हा गॅस तयार करणं परवडेल का? हा गॅस तयार करायला काय काय लागतं?
या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील ती प्रियदर्शनची संकल्पना आणि बायोगॅस म्हणजे काय हे समजून घेतल्यानंतर.
बायोगॅस हा विषयी चर्चा आपल्या देशात गेल्या ५०-६० वर्षांपासून सुरू आहे.
ग्रामीण भागात बायोगॅस गोबरगॅसची निर्मिती करता येते, पण शहरी भागात काय?
शहरी भागात स्वयंपाकघरातल्या दररोज तयार होणाऱ्या ओल्या कचऱ्याचं करायचं काय? हा प्रश्न असतो.
प्रियदर्शनशने हाच ओला कचरा घरातल्या घरातच जिरवून बायोगॅसच्या रुपानं स्वयंपाकासाठी वापरला.
पुण्यासारख्या शहरात बायोगॅस तयार करता यावा यासाठी मूळ बायोगॅस यंत्रामध्ये काही सुधारणा प्रियदर्शनशने केल्या .
प्रियदर्शनने स्वतः यंत्र वापरुन त्यातल्या अडचणी सोडवण्यासाठी त्यात सुधारणा करायला सुरुवात केली.
एका टप्प्यावर जेंव्हा आता हे वापरायला सोपं झालंय लक्षात आलं तेंव्हा इतरांनाही त्याचे फायदे सांगून वापरायला सांगीतलं.
सुधारित बायोगॅस यंत्रात घरातला ओला कचरा जसाच्या तसा टाकता येतो.
कचऱ्यापासून बायोगॅस कसा तयार होतो?
एका मोठ्या डब्यामध्ये ज्याला ‘डायजेस्टर’ म्हटलं जातं, त्यात घरातला ओला कचरा टाकला जातो.
यामध्ये भाज्या, उरलेलं अन्न, फळांची सालं हे सगळं टाकता येतं.
हिरवं गवत, जनावरांचं शेण मानवी मैला अशा विविध पदार्थापासून ‘बायोगॅस निर्मिती होऊ शकते.
डायजेस्टरमधले सूक्ष्मजीव त्यांचं विघटन करतात.
त्यातून तीन गोष्टी मिळतात.
- स्वयंपाकाचा गॅस तयार होतो.
- द्रव्य रुपातलं जैविक खत मिळतं. जे बागेत किंवा शेतात वापरता येतं.
- अन्नातला चोथा हा सहा महिन्यांमधून एकदा बाहेर काढला जातो आणि तो सुद्धा खत म्हणून वापरला जातो.
यातून जो गॅस निर्माण होतो तो एका फुग्यात गोळा केला जातो. फुगा फुगला की कळतं गॅस तयार झाला आहे.
गॅस भरायला लागला की तो फुगा फुगतो. गॅस वापरायला सुरुवात केली की तो खाली येतो.
बायोगॅससाठी किती कचरा आवश्यक आहे?
एका कुटुंबाची गॅसची पूर्ण गरज भागवण्यासाठी दररोज ८-१० किलो ओला कचरा लागतो.
शहरातल्या छोट्या परीवारात इतका कचरा तयार होणार नाही कदाचित, तरीही एलपीजीचा एकूण वापरातला थोडा भाग तरी कमी करायला नक्की मदत होऊ शकते.
बायोगॅस पूर्णपणे नैसर्गिक वायूला म्हणजेच एलपीजीला पर्याय ठरला नाही तरीही या दोन पद्धती परस्परपूरक ठरू शकतील.
कचऱ्यामध्ये ऊर्जा किती आहे हे महत्त्वाचं ठरतं. त्याला ‘कॅलोरिफीक व्हॅल्यू’ असं म्हणतात.
कचरा विघटनासाठी जिवाणूंची गरज असते.
या सिस्टिमकडे नीट लक्ष द्यावं लागतं आणि काळजीही घ्यावी लागते.
धरसोडपणा अजिबात उपयोगाचा नसतो.
जर सगळ्यांनी एकत्र येऊन बायोगॅस निर्मिती सुरू केली तर यशाचं प्रमाण ही वाढतं.
प्रियदर्शननी आपल्या परिसरातल्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना यात सामावून घेतलं आहे.
उर्जा पुरवणारे म्हणून “एनर्जी सप्लायर” अशी या स्वच्छता कर्मचाऱ्यांना बढती दिलेली आहे.
प्रियदर्शनची “वायू” ही सिस्टिम ब-याच ठिकाणी यशस्वीपणे सुरु आहे.
पुण्यातल्या सहकारनगरमध्ये राहणाऱ्या आणि घरात पोळी भाजी केंद्र चालवणाऱ्या मेधा भावे, यांनी त्यांच्या गच्चीवर हा छोटा बायोगॅस बसवून घेतला आहे.
“कचऱ्याची विल्हेवाट हा माझ्यासमोर मोठा प्रश्न होता. तो आत सुटला आहे. बायोगॅसवर आम्ही सकाळचा चहा, नाश्ता, एक भाजी एवढं सगळं करतो. एका शेगडीवर सिलेंडरचं ही कनेक्शन आहे. पण कचऱ्यापासून गॅस तयार होत असल्यामुळं त्या LPG सिलेंडरचा वापर कमी झालाय,” असं मेधा भावे यांनी नमूद केलंय.
पुण्यातील सातारा रोडवरील सुपर्ण मंगल कार्यालय तसंच पिंपरीतल्या किसनकृपा सोसायटीनं या ‘वायू’चा वापर केला आहे.
हिंजवडीजवळ ‘बायोगॅस’वर चालणारा कॅफे चालवला जातो.
पुण्यातली कॉलेजेस, मंगल कार्यालय त्याचबरोबर, मुंबई, सांगली, औरंगाबाद, कोल्हापूर या शहरांमध्ये “वायु” वापरले जातं.
२ किलो पासून प्रतिदिन १०० किलो कचरा रोज जिरेल अशा आकाराची यंत्रे सध्या वापरात आहेत.
बायोगॅस निर्मितीसाठी सुरुवातीला थोडा खर्च करावा लागतो त्यानंतर इंधन बचत होऊ शकते.
‘वायू मॉडेल’ करण्यामागचा आपला उद्देश सांगताना प्रियदर्शन सहस्त्रबुद्धे सांगतात,
पृथ्वीरक्षणाची ताकद सामान्य माणसाच्या हातात यावी हा उद्देश आहे.
हवामान बदल रोखण्यासाठी चळवळ उभी व्हावी यासाठी आम्ही प्रयत्न करतोय.
इंधनाच्या वाढत्या किंमतींना बायोगॅस पर्याय ठरेल का ? हे येणारा काळच ठरवेल.
पर्यावरणपूरक बायोगॅस निर्मितीतलं प्रियदर्शन सहस्त्रबुद्धे यांचं “वायू” मॉडेल सध्या सर्वांच्या कुतुहलाचा विषय बनलं आहे.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

'रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा
'रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा
Good
बायोगॅस निमिर्ती ची प्रयोगासाठी क्रृती /प्रक्रीया पाठवा हि विनंती