पुण्या-मुंबईच्या घराघरात सेंद्रिय पदार्थ पोचवून शेतकरी जोडप्याने स्वतःचा ब्रँड तयार केला

२००५ मध्ये त्यांनी ठरवले की आपल्या आसपासच्या शेतकऱ्यांनाही यात सहभागी करून घ्यायचं आणि त्यांना एका व्यासपीठावर आणण्याचा प्रयत्न करायचा.

अहमदनगरच्या गुंडेगाव इथं राहणारे संतोष भापकर आणि त्यांची पत्नी ज्योती त्यांच्या ‘संपूर्ण शेतकरी’ या ब्रँडद्वारे त्यांची उत्पादनं पुणे आणि मुंबईतल्या ५० पेक्षा जास्त आऊटलेट्स आणि २०० घरांमध्ये पोचवत आहेत!

गेल्या काही वर्षांत सर्वांचाच सेंद्रिय आणि नैसर्गिक शेतीकडे कल वाढल्याचं आपण पाहतो आहे.

भारतातील पारंपरिक शेती ही रासायनिक शेती नसून सेंद्रिय आणि नैसर्गिक शेती आहे.

रसायनांचा शेतीत खूप उशीरा वापर सुरू झाला.

पूर्वीच्या काळी लोक केवळ नैसर्गिक पद्धतींवर अवलंबून होते.

आजही अशी अनेक उदाहरणे तुम्हाला तुमच्या आजूबाजूला पाहायला मिळतील, की कुठल्याही रसायनाशिवाय शेती, ती पण वर्षांनुवर्ष करणारे शेतकरी अजूनही आहेत.

आज आम्ही तुम्हाला अशाच एका शेतकरी कुटुंबाची ओळख करून देणार आहोत.

ही गोष्ट महाराष्ट्रातील अहमद नगरमधल्या गुंडेगावचे रहिवासी संतोष भापकर आणि त्यांची पत्नी ज्योती भापकर यांची आहे.

संतोषचे वडील सेंद्रिय आणि नैसर्गिक शेती करायचे. त्यांनी कधीही शेतात रसायनांचा वापर केला नाही.

संतोषनेही वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवण्याचा प्रयत्न केला.

इतकंच नाही तर बाकीच्या शेतकऱ्यांनाही रसायनमुक्त शेतीचा मार्ग दाखवण्याचा प्रयत्न संतोष करत होते.

संतोषने ठरवले की आधी शेतकरी, आणि ग्राहकांना याबाबत जागरूक करायचं.

एकदा विचार पक्का झाल्यावर २००५ ला त्यांनी कंबर कसून ही मोहीम सुरू केली.

त्यासाठी त्यांना असंख्य आव्हानांचा सामना करावा लागला, पण संतोष यांनी हार मानली नाही.

आज संतोष भापकर आणि त्यांची पत्नी ज्योती भापकर यांची नावे प्रगतीशील शेतकऱ्यांमध्ये गणली जातात.

कारण त्यांनी केवळ स्वतःचेच नाही तर त्यांच्या भागातील जवळपास सर्वच शेतकऱ्यांचे नाव मोठे केले.

“संपूर्ण शेतकरी” या ब्रँडखाली त्यांचं उत्पादन पॅक होतं, आणि देशातल्या वेगवेगळ्या शहरांमध्ये विकलं जातं.

संपूर्ण शेतकरी ब्रँडची कशी झाली सुरवात?

अहमदनगरच्या गुंडेगाव इथं राहणारे संतोष नेहमीच सेंद्रिय आणि नैसर्गिक शेतीला प्राधान्य देतात.

२००५ मध्ये त्यांनी ठरवले की, आपल्या आसपासच्या शेतकऱ्यांनाही यात सहभागी करून घ्यायचं आणि त्यांना एका व्यासपीठावर आणण्याचा प्रयत्न करायचा.

संतोष यांनी त्यांच्या गावातल्या शेतकऱ्यांशी बोलून त्यांना त्यांच्या जमिनीच्या थोड्या भागात सेंद्रिय उत्पादन घ्यायला प्रोत्साहित केलं.

लोकांचा उत्साह वाढावा म्हणून ज्याच्या जमिनीवर सेंद्रिय पद्धतीनं उत्पादन चांगले येईल, त्याचा सत्कार केला जायचा.

त्यांच्या कामाची ही पद्धत आणि त्यांचा पुढाकार, गावोगावी वाढायला लागला.

पण हळूहळू संतोषच्या असं लक्षात आलं की, या शेतकऱ्यांचा सत्कार करण्यासाठी ज्यांना बोलावलं त्यांनीच या शेतकरी कार्यक्रमांचा स्वतःच्या फायद्यासाठी उपयोग करून घेतला.

शेतकऱ्यांच्या कौतुकापेक्षा या व्यासपीठाचा वापर स्वत:च्या फायद्यासाठी हे आमंत्रित करत आहे आहेत हे संतोषना खटकलं, म्हणून त्यांनी हे कार्यक्रम बंद केले.

आता संतोषला काहीतरी वेगळं करायचं होतं.

कारण आता सेंद्रिय शेती करणारे शेतकरी त्याच्याकडे मोठ्या संख्येनं यायला लागले.

या शेतकऱ्यांना आपलं सेंद्रिय उत्पादन विकण्यासाठी चांगली बाजारपेठ मिळत नव्हती.

त्यानंतर संतोषने गावातील शेतकऱ्यांना एकत्र करून त्यांचे स्वतंत्र गट तयार केले.

या क्लस्टरमध्ये साधारण १०० शेतकरी आहेत, जे त्यांच्या शेतात वेगवेगळ्या प्रकारची पिकं घेतात ज्यामुळे ते ग्राहकांची मागणी पूर्ण करू शकतात.

संतोषने शेतकऱ्यांना एकत्रितपणे सामुदायिक शेती करायला कायम प्रोत्साहित केलं.

यामुळेच शेतकरी एकमेकांच्या मदतीने पुढे जाऊ शकतात.

संतोष सांगतात, ‘आमचा परिसर सर्व बाजूंनी डोंगरांनी वेढलेला आहे आणि बहुतांशी मान्सूनवर अवलंबून आहे. इथे मान्सून चांगला आहे, त्यामुळे आम्ही शेतीचा दर्जा सुधारण्यावर भर दिला.

सगळ्या शेतकऱ्यांना गायी पाळण्याचा सल्ला दिला ज्यामुळं शेण आणि गोमूत्र घरच्या घरी उपलब्ध होईल.

तसंच यापासून खत, जीवामृत, अशा वस्तू ही तयार करता येतील.’

पेरणीपूर्वी जमीन चांगली तयार करून, शेतकऱ्यांना सतत उत्पन्न मिळावे यासाठी सह-पीकांचे मॉडेलही त्यांनी तयार केलं

म्हणजे शेतात डाळी, भाजीपाला आणि काही औषधी पिकांचं उत्पादनही घेतलं जातं.

संतोष भापकरांनी बहुतेक पारंपारिक पिकांनाच प्राधान्य दिलं आहे.

त्यांच्या पिकांमध्ये हुलगा, राजमा, मूग, उडीद, मसूर यांसारखी कडधान्यं, भुईमूग, तीळ, सूर्यफूल, खुर्सानी यासारखी काही तेल पिके आणि ज्वारी, बाजरी अशी काही तृणधान्ये पिकवली जातात.

भापकर दांपत्याने मार्केटिंगवरही भर दिला.

संपूर्ण शेतकरी संतोष भापकर ज्योती भापकर

संतोष आणि ज्योती यांनी या शेतकऱ्यांची मेहनत बाजारात किंवा मध्यस्थांकडे जाऊ देणार नाही असा पक्का निर्धार केला.

त्यांनी शेतकऱ्यांकडून त्यांचं सेंद्रिय उत्पादन स्वतःघ्यायला सुरुवात केली.

त्याला पक्की बाजारपेठ आज नसली तरी आपण स्वत:ची बाजारपेठ का निर्माण करू नये? असा विचार संतोष यांनी केला.

सगळ्यात आधी सगळ्या डाळी, धान्य वगैरे गाडीत घेऊन महामार्गावर उभं राहून प्रवाशांना विकायला सुरुवात केली.

महिनोनमहिने महामार्गावर न थकता विक्री करत असताना पुण्यातली बाजारपेठ शोधायला ही संतोष भापकरांनी सुरुवात होती.

बाजारपेठ सहजासहजी उपलब्ध झाली नाही, त्यासाठी बराच वेळही लागला.

पण भापकर कुटुंबाने प्रयत्न सोडले नाहीत. आणि शेवटी एक दिवस मेहनत फळाला आली.

पुण्याच्या काही दुकानात भापककरांची जी उत्पादनं ठेवली होती, तिथून फोन यायला लागले की “तुमच्या डाळीची मागणी वाढते आहे”.

ज्या लोकांपर्यंत माल पोहोचवला गेला त्यांनीही संपर्क साधला आणि त्यानंतर प्रक्रिया युनिट उभं करण्यावर संतोष भापकरांनी लक्ष केंद्रित केलं.

सर्वप्रथम त्यांनी कर्ज घेतलं आणि डाळीवर प्रक्रिया करून पुढं पाठवता यावी म्हणून डाळ गिरणी उभी केली.

नंतर पॅकेजिंग युनिटवर काम करण्यात आले.

शेतकरी त्यांच्या शेतमालाची कापणी करतात आणि ते धान्य या केंद्रात नेतात.

इथं सगळी उत्पादनं व्यवस्थित साफ करुन त्यावर प्रक्रिया केली जाते.

या पॅकेजिंग सेंटरमध्ये वेगवेगळ्या पॅकेजमध्ये धान्य पॅक केलं जातं.

त्यांच्यावर ब्रँडनेम टॅग लावला जातो.

एकत्र केलेली उत्पादनं पुणे, मुंबई आणि श्रीगोंदा इथल्या बाजारपेठेत रवाना होतात.

या संपूर्ण प्रक्रियेत गावातल्या महिला आणि तरुणांना रोजगार मिळाला.

संतोषनी सगळ्या उत्पादनांच्या प्रक्रियेसाठी आणि पॅकेजिंगसाठी काही मार्गदर्शक तत्त्वं घालून दिली आहेत ज्यामुळे गुणवत्तेत कोणतीही तडजोड होत नाही.

सध्या “संपूर्ण शेतकरी” उत्पादनं पुणे-मुंबईच्या ५० आऊटलेट्समध्ये जातात.

पुण्यातील २०० आणि मुंबईतल्या ३२ घरांमध्ये ही उत्पादनं थेट पोचतात.

ग्राहकांकडून थेट ऑर्डर ही मिळते आणि त्यानुसार उत्पादनं पॅकेज पाठवली जातात.

नियमित ग्राहकांसाठी काही ऑफर आणि सवलतीचं मॉडेलसुद्धा उपलब्ध आहे.

या शेती आणि मार्केटिंगच्या मॉडेलद्वारे सहभागी शेतकरी आज महिन्याला सुमारे ५ लाख रुपये कमवतात.

शेतकरी, महिला आणि तरुणांना चांगली मासिक प्राप्ती आणि ग्राहकांना शुद्ध, सकस आणि रसायनमुक्त धान्य असा दुहेरी लाभ होतो.

ग्राहकांची संख्या वाढवण्यासाठी वेगवेगळ्या कार्यक्रमांत संतोष भापकर आपली उत्पादनं घेऊन न कंटाळता पोचतात.

कृषी विभागाकडून ही, सगळ्या प्रकारची मदत संतोष भापकर आणि त्यांच्या शेतकऱ्यांना मिळते.

अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे.

संपूर्ण शेतकरी संतोष भापकर ज्योती भापकर

जास्त अभ्यास करता आला नाही पण तरीही मेहनत आणि चिकाटीने संतोष भापकर सगळ्यांना सोबत घेऊन एका टप्प्यावर पोहोचले आहेत.

आता लक्ष्य आहे ते या उत्पादनांना देशभर नेण्याचं.

येणाऱ्या पिढ्यांना संतोष भापकरांची एवढीच विनंती आहे की, उच्च शिक्षण घेऊन त्यांनी शेती आणि शेतकऱ्यांना विसरू नये.

आपल्या देशाच्या अन्नदात्याच्या प्रगतीवर प्रेम करा आणि शेतकऱ्यांची उत्पादनं आवर्जून विकत घ्या.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठीयेथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

1 thought on “पुण्या-मुंबईच्या घराघरात सेंद्रिय पदार्थ पोचवून शेतकरी जोडप्याने स्वतःचा ब्रँड तयार केला”

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय