बॅंगलोर डायरीज… श्री श्रींच्या सान्निध्यात (भाग- २ )

shri-shri-ravishankar
दिनांक २ जुन ….

सकाळी पाचला अलार्म वाजतो, आणि डोळे उघडतात, पाच तासाचीच पण खूप शांत झोप झालेली असते, वातावरणात एक वेगळीच पोझीटीव्ह ऊर्जा जाणवतेय, मी तयार होऊन पावणे सहा वाजताच यज्ञशाळेत धावत पळत पोहचतो, पण अगोदरच हॉल बऱ्यापैकी भरुन गेलाय.

सगळे मस्त आपापल्या चादरी-आसन अंथरून बसले आहेत, शार्प सहा वाजता स्टेजवर पांढऱ्या ट्रॅकसुटमध्ये एकदम काटक शरीरायष्टीचे विनीतभाई येतात.

“जो लेटे है, वो बैठ जाये, जो बैठे है, वो सीधा बैठे।”

असं म्हणत वॉर्म-अप ला सुरुवात होते, मग एकामागून एक बॉडी एक्सरसाईज होतात.

पुढचा जवळजवळ एक तास, पोटावरची, पाठीवरची आसने शिकवली जाते,  संपूर्ण शरीरात एक वेगळीच ऊर्जा संचारते.

मग गुरुजींच्या आवाजात लॉंग सुदर्शन क्रिया होते, योगनिद्रेसोबत ही साधना संपते, प्रत्येकाला एकेक सेवा वाटून दिली जाते, जितकी मनापासून सेवा कराल तितके छान ध्यान लागेल, असा संदेशही दिला जातो.

न्याहरी करून आम्ही पुन्हा यज्ञाशाळेत जमतो, पुण्याच्या नेहादीदी पेंडसे सर्वांचे स्वागत करतात.

दोन दोन जणांची एक जोडी बनवून आपले गुण, अवगुण एकमेकाना सांगितले जातात, मग स्वतःची आणि एकमेकांची स्तुती केली जाते.

मग व्हिडीओमध्ये गुरुजी समजावतात की आपली किंवा दुसऱ्याची स्तुती परमेश्वराला पोहचते, त्यामुळे ‘दिल खोलके’ तारीफ करा!….. केलेल्या स्तुतीचा मनपूर्वक स्वीकार करा.

मग मुद्रा प्राणायाम शिकवला जातो, आणि त्यानंतर गुरुजींचे आगमन होते, गुरुजींच्या येण्याने वातावरणात चैतन्य येते, गुरुजी म्हणतात, चला, आज वेगळे असे ‘वर्णमाला ध्यान’ करूया.

बाराखडीतला एकेक शब्द उच्चारत हे आगळेवेगळे ध्यान केले जाते, खूप मजा येते,.

ध्यान झाल्यावर, गुरुजी म्हणतात, लहानपणी आपण सर्वात पहिले ‘अ आ इ ई’ , ही बाराखडीच शिकलो, तेव्हा आपण खूप निरागस होतो, ही बाराखडी ऐकताच आपले निरागस भाव पुन्हा जागृत होतात.

“चला, तुमची जेवायची वेळ झाली आहे,”

असे म्हणत जितक्या वेगाने आले, तसे पटकन गुरुजी निरोप घेतात, भस्त्रिका प्राणायाम नंतर जेवणाची सुटी होते.

दुपारचे सेशन विशालाक्षी मंडपात आहे, माणिक भय्या, योगनिद्रेने सेशनची सुरुवात करतात.

आणि अचानकच आयुष्यात नश्वरतेची जाणीव होते, आणि सगळं सगळं शांत होतं, आपण आनंदाने मरणाला सामोरे जायला  तयार होतो.

मग आपला शेवटचा क्षण येतो, अशी कल्पना करतो.

‘ह्याची देही ह्याची डोळा’, आपण आपल्याच मरण्याचा अदभुत अनुभव घेतो.

त्यानंतर आपण कल्पनेतच जनन प्रक्रिया अनुभवतो, आपण आईच्या गर्भात सुरक्षित आहोत, ते आठवायला सांगतात, मग आपला जन्म होतो, तो क्षण!..

मग आपण लहान बाळासारखे रडायला लागतो, हातपाय आपटू लागतो.

खरचं खुप मजा येते.

माणिकभाई गोड आवाजात भस्त्रिकेनंतर लावायचे बंध शिकवतात.

दिशाप्रणाम होऊन सेशन संपतो.

संध्याकाळचा सत्संग ओपन अँफिथिएटर मध्ये आहे, भावूक तितकीच जोशपूर्ण भजने होतात.

प्रश्नोत्तरामध्ये बिजनेस, मॅनेजमेंट आणि स्टार्टअप विषयी अनेक प्रश्न असतात, गुरुजी प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर उत्तर देतात.

जबलपुरच्या काही पत्रकारांनी आश्रमात कोर्स केला आहे, ते आपले अनुभव गुरुजींसमोर शेअर करतात, शतशः नमन करतात.

मुला मुलींचा एक ग्रूप बेटी बचाओ थीमवर बाहुबळीचं एक गाणं घेऊन त्यावर सुंदर परफॉर्मन्स सादर करून सर्वांची मने जिंकतात.

काही पुस्तकांच्या प्रकाशनसोबत सत्संग संपतो.

रात्री एका व्हिडीओ सेशननंतर नेहादीदी कडून ऑफिशियल मौन दिले जाते.

दिवस कसा संपला कळतच नाही,

पण दिवसभर गुरुजीचं व्यक्तिमत्व भुरळ घालत राहतं, एवढं मात्र ठळकपणे जाणवतं राहतं!…

Manachetalks

'रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

'रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!