समोरच्याचं मन वाचायला शिका… जाणून घ्या हे मनाचं रहस्य | Mind Reading Tricks in Marathi

मन म्हणजे वाऱ्यासारखं अगदी चंचल. क्षणात एका विषयावरुन दुसरीकडेच धावत सुटणारं.

मग अशा मनाचा ठाव घेणं कसं शक्य आहे?

मुळात समोरच्या व्यक्तीच्या मनात काय चाललंय हे आपण ओळखू शकतो का हा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल.

म्हणूनच हा खास लेख घेऊन मनाचेTalks वाचकांसमोर येत आहे.

बऱ्याच वेळा असं होतं की आपण एखाद्या महत्त्वाच्या विषयावर बोलत असतो. खूप मोठा निर्णय घ्यायचा असतो.

पण समोरच्या व्यक्तीच्या मनात काय चाललंय हे आपल्याला कळतच नाही. अशावेळी आपल्याला वाटतं की जर या क्षणी मला समोरच्या माणसाचे विचार समजले तर नक्कीच मी माझं मत अधिक प्रभावीपणे किंवा सुस्पष्टपणे मांडू शकतो.

कधीकधी तर एखादी परिस्थिती एवढी नाजूक असते की अधिक उणा एक शब्द सुद्धा भयंकर वादळ निर्माण करु शकतो.

अशावेळी तोलून मापून बोलणं हेच हिताचं असतं. मग अशा प्रसंगात जर का आपण ज्यांच्याशी संवाद साधतोय त्यांच्या मनातील विचार वाचू शकलो तर …. नक्कीच अधिक सतर्क होऊन पुढची चर्चा होऊ शकते.

अनेक पौराणिक कथा, संतांच्या गोष्टी यातून आपल्याला हे कळलं असेल की योगसिद्धी प्राप्त झालेल्या व्यक्ती इतरांचे मन वाचू शकतात. आपण काहीही न बोलता एखाद्या सिद्धपुरुषासमोर गेलो तर आपली समस्या त्यांना नेमकी कळते. यामागे त्यांची कठोर साधना असते.

तुमच्यापैकी काही जणांनी असा अनुभव घेतला असेल तर काहींना यावर विश्वास ठेवणे कठीण जाईल.

पण मन वाचण्याची ही शक्ती किंवा कला निसर्गात आपल्याला आढळून येते. आपल्या सभोवतालच्या वातावरणात सतत काही ना काही घडामोडी घडत असतात. बदल होत असतात.

या हालचालींमधून काही संकेत आपल्यापर्यंत पोहोचत असतात. झाडांची सळसळ, सूर्योदय, सूर्यास्त, बदलणारे ऋतु यातून निसर्गात चैतन्य आहे, जिवंतपणा आहे हे आपल्याला समजते.

झाडावरून गळून पडणारी पाने, उन्हाचा कवडसा आणि त्यात नाचणारे धुळीचे कण, आकाशात ढगांचा सतत बदलणारा आकार यावरुन आपल्याला हेच समजतं की या सृष्टीतील प्रत्येक वस्तूला एक लय आहे.

इथली प्रत्येक गोष्ट बदलत असते. स्थिर किंवा अजिबात हालचाल होत नाही अशी कोणतीही जिवंत गोष्टच अस्तित्वात नाही.

म्हणजेच चराचरात सतत चालणारी एक लय, नाद, कंपने यांच्याशी निगडीत अशी विशिष्ट शक्ती भरून राहिली आहे.

भगवान बुद्धांनी असं म्हटलं आहे की मन म्हणजे सतत चालणाऱ्या क्षणांची एक मालिका. आणि हे खरंच आहे.

आपल्या मनात सतत कोणत्या ना कोणत्या क्षणी घडलेल्या घटनांचा विचार सुरू असतो. त्या घटना भूतकाळातील असतील किंवा भविष्यात पुढच्या क्षणाला काय घडणार याचाही विचार मनात सुरु असतोच.

म्हणजेच मनात सुद्धा सतत एक हालचाल, विचारांची ये जा होत असते.

माणसाचं आयुष्य ही सुद्धा अशीच एक मालिका आहे. यात सतत ‘स्व’ चा संवाद बाह्य जगाशी होत असतो. यामध्ये जशा ठळक दिसणाऱ्या घटना असतात तशाच अगदी अव्यक्त किंवा अप्रत्यक्षपणे घडणाऱ्या घटना आणि त्यांच्याशी निगडीत प्रतिक्रिया यांचा समावेश होतो.

आपलं शरीर पंचमहाभूतांचे बनलेले आहे. त्यामुळे रंग, गंध, स्पर्श, चव, आवाज यांना आपले शरीर प्रतिसाद देत असते.

थोडक्यात काय तर पंचेंद्रिये ही आपल्या अभिव्यक्तीचे माध्यम आहेत. सोप्या पद्धतीने सांगायचे तर कोणत्याही गोष्टीला रिस्पॉन्स देताना आपण डोळे, नाक, कान, जीभ आणि त्वचेमार्फत जो अनुभव मिळतो त्यावरुन प्रतिक्रिया व्यक्त करतो.

समजा गोड चव असेल तर आनंद होतो आणि कडू चव असेल तर चेहरा वाकडा करतो. अती थंड किंवा गरम वस्तू हातात आली तर झटकन प्रतिक्षिप्त क्रियेने हात झटकतो.

ही आपल्या शरीराची आजूबाजूच्या वातावरणाला प्रतिसाद देण्याची पद्धत आहे. ती जन्मापासून आपल्यामध्ये आलेली असते. लहान बाळाच्या डोळ्यावर ऊन आलं तर ते मान वळवतं, डोळे मिटून घेतं.

हे आपण त्याला शिकवतो का? अजिबात नाही, हे ज्ञान त्याला उपजतच असतं. आणि काही गोष्टी आपण अनुभवातून शिकत जातो. वागणं, बोलणं, विचार करणं हे जसे अनुभव येतील तसतसं घडत जातं. आणि प्रत्येक व्यक्तीचा स्वतःचा असा एक पॅटर्न तयार होतो.

शरीरातील प्रत्येक पेशीला बाहेरील वातावरणातील बदल समजतात. त्यावर कोणती प्रतिक्रिया द्यायची हे सुद्धा कळतं. म्हणूनच थंडी वाजली की आपण शरीर आक्रसून घेतो.

उन्हात पोळून निघालो की पाणी पितो. याचाच अर्थ असा की बाहेरील लहानसा बदल देखील आपल्या पेशी अचूक हेरतात आणि त्यानुसार संवेदना निर्माण करतात. मानवी संवेदनांची क्षमता आपल्या कल्पनेपलीकडे आहे.

त्यांचा वापर आपण किती समर्थपणे करतो यावर सर्व काही अवलंबून असते.

योगी, साधक सुहानी शहा सारखे माइंड रीडर स्वतःच्या क्षमता वाढवतात. त्यांचा सूक्ष्म स्तरावर वापर करतात. त्यामुळे त्यांच्या संवेदना आपल्यापेक्षा अधिक जागृत असतात.

त्यांचे शरीर व मन आजूबाजूला काय चाललंय हे चटकन टिपून घेते. वातावरणातील अगदी सूक्ष्म बदल सुद्धा त्यांना कळून येतात. मन वाचणं हा यातलाच एक भाग आहे.

जेव्हा आपल्या मनात कोणताही विचार येतो तेव्हा त्याचे पडसाद शरीरावर उमटतात.

मनातल्या विचारांशी सुसंगत अशा शारीरिक हालचाली घडत असतात. डोळे विस्फारले जाणे, पापण्यांची उघडझाप, हातापायाची हालचाल यामागे विशिष्ट अर्थ असतो.

चेहऱ्यावरील बदलणारे हावभाव, मान वळवणे, खांदे उडवणे याला देहबोली म्हणतात. जसे मनातील विचार बदलतील तशी देहबोली बदलत जाते.
माणसांची उभं रहाण्याची पद्धत, चालणं, बसणं, इतकंच काय हसणं पण वेगवेगळ्या अर्थाचं असतं.

कधीकधी हे हास्य निखळ तर कधी कुत्सित हास्य असतं. या दोघांतला फरक ओळखणे म्हणजे बॉडी लँग्वेज ओळखणे.

एकदा का आपल्याला देहबोली वाचता यायला लागली की मग समोरच्या माणसाच्या मनात काय चाललंय याचा अंदाज आपण बांधू शकतो.

कारण मनात चाललेल्या विचारांचं बाह्य प्रकटीकरण म्हणजे देहबोली !!!

पण हे करणं सोपं नाही बरं. यासाठी सतत वर्षानुवर्षे सराव करावा लागतो. सतत अभ्यास करावा लागतो. व्यक्ती तितक्या प्रकृती!!!

त्यामुळे प्रत्येक माणसाची देहबोली वेगळी. त्यातून निघणारा अर्थही निरनिराळा असतो. पण सवयीने आपण हे करू शकतो.

त्यासाठी गरज आहे डोळे उघडे ठेवून वावरण्याची. म्हणजेच आपल्याला निरीक्षण शक्ती वाढविणे अतिशय आवश्यक आहे.

बोलत असताना समोरच्या माणसाच्या चेहऱ्यावरील सूक्ष्म बदल टिपता आले पाहिजेत.

यासाठी मनाची शक्ती मदतीला येते. जर आपण सतत जागृत, सजग अवस्थेत असलो तर मन एखाद्या टीपकागदाप्रमाणे भोवतालचे बदल टिपून घेतं.

याउलट इतरांशी संवाद साधताना आपलं लक्ष दुसरीकडेच असेल, मनात भलतेच विचार सुरू असतील तर आपल्याला त्यांच्यातील सूक्ष्म बदल समजणारच नाहीत.

सबकॉन्शस माईंड म्हणजे अव्यक्त पातळीवरील मन. याची ताकद अफाट असते. आणि जसजसे आपण जागरूक होत जाऊ तसतशी याची क्षमता वाढते.

मनोविज्ञानात माईंडफुलनेस, अवेअरनेस हे शब्द तुम्ही ऐकलेच असतील. याचाच अर्थ सूक्ष्म निरीक्षण करणे, त्याची मनात नोंद करणे आणि त्याचा संयुक्तिक अर्थ लावणे.

अशाप्रकारे निष्कर्ष काढणे म्हणजेच इतरांचे मन वाचणे.

आता मनकवडे होण्यामागचे गुपित तुम्हाला समजलेच असेल. पण सर्वात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा.

जेव्हा कोणत्याही व्यक्तीचे मन तुम्हाला वाचायचे असेल तेव्हा आधी तुमचे मन शांत अवस्थेत असले पाहिजे. एखादं तळं जेव्हा अगदी शांत असतं तेव्हा आजूबाजूच्या झाडांचं त्यात प्रतिबिंब दिसतं.

जणू काही आरशातच पहावं इतकं स्पष्ट!!!

पण या पाण्यात खडा टाकला की तरंग निर्माण होतात आणि मग यात प्रतिबिंब दिसत नाही. मनाचंही असंच आहे.

मनात खळबळ माजली तर आपण अस्वस्थ होऊन जातो आणि मग आपण शांतपणे निरीक्षण करु शकत नाही. त्याचप्रमाणे एखाद्या व्यक्तीशी संवाद साधताना त्या व्यक्तीबद्दलचे पूर्वग्रह मनातून पूर्णपणे काढून टाकले पाहिजेत.

मनाची पाटी अगदी कोरी करुन त्यांना सामोरे जावे. अन्यथा त्यांच्या देहबोलीचा चुकीचा अर्थ आपण लावतो.

समजा पूर्वी एखाद्याशी भांडण झाले असेल तर त्याचा राग मनात ठेवून तुम्ही त्याचं आताचं वागणं बोलणं यांचा निष्कर्ष काढलात तर नक्कीच चूक होऊ शकते.

म्हणून अगदी कोऱ्या मनाने प्रत्येक नवीन अनुभव घ्यावा. अर्थात याचीही सवय करावी लागतेच.

मनाला पुन्हा पुन्हा बजावून सांगावे लागते तेव्हाच असा निकोप दृष्टीकोन तयार होतो.

आपल्या प्रत्येकाच्या शरीराभोवती एक तेजोवलय असतं. त्याला ऑरा असं म्हणतात. या ऑराचा रंग, तेजस्वीपणा तसंच एखाद्याच्या शरीराचा गंध यावरुनही त्याचे विचार, मनस्थिती इतकंच नाही तर त्या व्यक्तीला कोणते आजार आहेत हे देखील कळू शकतं.

यासाठी त्यांच्याशी ओळख असण्याची किंवा प्रश्न विचारण्याची गरज नसते. फक्त ती व्यक्ती समोर उभी राहिली तरी बऱ्याच गोष्टी समजतात.

योगसूत्रामध्ये मनाच्या या शक्तीला वैशारद्य असे म्हटले आहे. तसेच ऋतंभरा ही देखील मनाची अवस्था वर्णन केलेली आहे.

या स्थितीत मन एवढे पवित्र झालेले असते की ते फक्त सत्यच पहाते.

याचाच अर्थ मन सजग असते. शुद्ध स्वरुपात असल्यामुळे मनाचे कोणतेही विकार त्याला स्पर्श करु शकत नाहीत. त्यामुळे जे सत्य आहे तेवढेच स्विकारले जाते.

यावरुन तुम्हाला कळलंच असेल की इतरांचे मन वाचण्यापूर्वी स्वतःच्या मनाला समजून घेतले पाहिजे. स्वतःचे दोष दूर करुन मन शांत, स्वच्छ आणि जागृत ठेवले तरच आपण दुसऱ्यांच्या मनातील विचार जाणून घेऊ शकतो. त्यांच्या मनापर्यंत पोहोचू शकतो.

म्हणून स्वतःभोवती होणारे छोटे छोटे बदल जाणीवपूर्वक अभ्यासले पाहिजेत.

इतरांबाबतची निरीक्षण शक्ती प्रयत्नपूर्वक वाढवली पाहिजे. आणि जे काही बदल होतात त्यांचा शांतपणे स्विकार करणे, विचलित न होणे शिकून घेतले तरच आपलं मन समर्थ होईल.

माणसाचं मन जेवढं सक्षम तेवढा तो सामर्थ्यवान!!! असा माणूस स्वतःचं मन जाणतो आणि इतरांच्या मनाचाही तळ गाठतो.

मग मनकवडं होण्याचं रहस्य कशात दडलंय हे समजलं का? हे कमेंट्स करुन सांगा बरं.

लेख आवडला तर लाईक व शेअर करायला विसरू नका.

Manachetalks

रहस्य जगण्याचे : समाधानी आयुष्याचे पुस्तक अमेझॉनवर खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.

रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.

रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे या पुस्तकाची अनुक्रमणिका खाली दिलेली आहे.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ Instagram वर मनाचेTalks ला फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय