आजकालच्या मुली आळशी झाल्या आहेत का? आपल्याला मिळणाऱ्या संधीचा त्या गैरफायदा घेतात का?

काय वाटते तुम्हाला? होऊ द्या चर्चा.
संवेदनशील आणि गुणी मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने दिलेला एक इंटरव्ह्यु सध्या गाजतो आहे.
ह्या इंटरव्ह्यु मध्ये सोनाली असे म्हणते की, सध्याच्या मुली ह्या आळशी झाल्या आहेत!! स्वतः फारसे काही कर्तुत्व न गाजवता ह्या मुली फक्त वेल सेटल्ड नवरा कसा मिळवता येईल, त्याच्या जीवावर मौज मजा कशी करता येईल असा विचार करतात. घरातली कोणतीही आर्थिक जबाबदारी घेत नाहीत वगैरे, वगैरे.
शिवाय ती पुढे असेही म्हणते की स्वयंपाक करणे म्हणजे काही सर्वस्व नाही, त्यापेक्षा इतरही महत्वाच्या गोष्टी आहेत ज्या मुलीनी करायला हव्यात.
काय आहे नेमके सत्य? सरसकट सगळ्याच मुली आळशी झाल्या आहेत का ?
सोनालीच्या ह्या इंटरव्ह्युच्या निमित्ताने आपण आज ह्या विषयावर चर्चा करणार आहोत.
शहरी भागातल्या, लहानपणापासून उत्तम शिक्षणाच्या संधी, घरी बरोबरीची वागणूक, मुलगी म्हणून कोणताही हक्क डावलला न जाणे, प्रत्येक बाबतीत मुलांशी बरोबरीची संधी अशा सगळ्या सुविधा मुलींना मिळतात.
त्यातील काही मुली उत्तम करियर करतात तर, काही मात्र केवळ उत्तम स्थळ मिळवण्यापूरते शिक्षण, नोकरी असे मिळवतात.
अशा मुलींचा कल नक्कीच अगदी सुस्थापित नवरा मिळवण्याकडे असतो, आपला पगार मात्र घरी न देता तो आपली हौसमौज, खरेदी, पार्लर, खादाडी ह्यावर खर्च करण्याकडे त्यांचा कल असतो.
हल्ली अशा मुलींचे प्रमाण वाढले आहे हयात शंका नाही. अर्थात उत्तम संधी मिळवून उत्तम करियर करणाऱ्या मुली सन्माननीय अपवाद आहेतच.
परंतु दुर्दैवाने अजूनही अशा मुली फक्त सुखवस्तू, उच्च मध्यमवर्गीय, शहरी भागातच आढळतात. बाकीच्या ठिकाणी अजूनही मुलींना दुय्यम वागणूक मिळते. जेमतेम दहावी, बारावी पर्यन्त शिकवून त्यांचे लग्न लावून देण्यात येते. त्यांनी शक्यतो घर सांभाळावे, स्वयंपाक पाणी, पाहुणे, आला गेला पहावे, मुलांचे संगोपन करावे अशीच अपेक्षा असते.
त्यांना घराला हातभार लावण्यासाठी नोकरी करावी लागली तरी ती साधी, ९ ते ५ अशी करायला मिळते.
ज्यामुळे त्यांचे घराकडे दुर्लक्ष होणार नाही. कित्येकदा घरासाठी नोकरीतील बढतीच्या संधी नाकाराव्या लागतात.
याउलट दुसरीकडे मुलगे मात्र १८/२० वर्षांचे झाले नाहीत तोवरच त्यांच्यावर उत्तम शिकण्याचे, चांगली नोकरी करून कमाई करण्याचे दडपण वाढू लागते.
एखाद्या मुलाला कलेच्या किंवा इतर क्षेत्रात करियर करायचे असेल, तर पालकच त्यातून तुला कमाई किती होणार, तुझ्या कुटुंबाला तू कसे पोसू शकणार अशा शंका काढतात.
परंतु कदाचित त्यामुळेच ह्या मुलांमध्ये मी कुटुंबप्रमुख आहे, माझ्या बायकोने माझे ऐकले पाहिजे, माझी सेवा केली पाहिजे ही भावना वाढू लागते. ते स्वतःला वरचढ समजू लागतात.
थोडक्यात हा सगळा वाढीच्या वयात मुलांवर असणाऱ्या दडपणाचा परिणाम आहे. मुलांवर उत्तम नोकरी, स्वतःचे घर/गाडी असणे, शहरी भागात राहणे ह्या गोष्टींचे दडपण तर मुलींवर सतत सुंदर दिसणे, घर सांभाळणे, स्वयंपाक करणे ह्या गोष्टींचे दडपण.
परंतु आता एकविसाव्या शतकात ह्या गोष्टी बदलल्या पाहिजेत. लहानपणापासून मुलामुलीना वाढवताना कोणत्याही प्रकारचा भेदभाव न ठेवता समानता आणली पाहिजे.
मुले व मुली दोघांनाही शिक्षण आणि घरकाम यांचे समान प्रशिक्षण दिले गेले पाहिजे.
त्यांना आपापल्या आवडीच्या क्षेत्रात करियर करण्याची मुभा असली पाहिजे. यामुळे संसार उभा करताना, त्यात दोघांचाही सारखाच सहभाग असला पाहिजे ही भावना आपोआपच त्यांच्यात रुजू लागेल.
मित्रमैत्रिणींनो, सोनालीच्या इंटरव्ह्युच्या निमित्ताने आज ह्या विषयाला पुन्हा तोंड फुटले आहे. तुम्हाला ह्या बाबतीत काय वाटते ते अगदी मनमोकळेपणाने आणि सविस्तरपणे आम्हाला सांगा.
हल्लीच्या मुलींचे वागणे चुकते आहे का? हल्लीच्या महिलाविषयक धोरणामुळे आता पुरुषांवर अन्याय होतो आहे का? का अजूनही बऱ्याच ठिकाणी स्त्रियांवरच अन्याय होतोय? त्यांना दुय्यम वागणूक मिळतेय? की हे सगळे चक्र आपल्याच सामाजिक जडणघडणी मुळे तयार झाले आहे.
काय वाटते तुम्हाला?
ह्याविषयावर जास्तीतजास्त चर्चा व्हावी, त्यानिमित्ताने समाजाची काही जुनी मते बदलण्यास हातभार लागावा म्हणून हा लेख जास्तीत जास्त शेयर करा.
होऊ द्या चर्चा.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ Instagram वर मनाचेTalks ला फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा