कर भला तो हो भला : कन्हैयालाल

लफंगा, ठग, कंजूष शेट, कठोर सावकार, बदमाश मुनिम, लालची बनिया, चलाख नोकर, बेईमान पोस्टमन, खोटा साक्षिदार, फूट पाडणारा सेक्रेटरी, बायकांवर डोळा ठेवणारा बेरकी, नफेखोर कारखानदार…… सामान्यत: भारतीय चित्रपटातले हे खलनायक. हे नसतील तर नायक झिरो. यांच्यामुळेच प्रेक्षकांच्या मूठी आवळल्या जातात, तोंडात अपशब्द येतात, हे मार खाऊ लागले की प्रेक्षकानां मनस्वी आनंद होतो, चित्रपटाच्या शेवटाला हे मेले पाहिजे किंवा जेलमध्ये गेले पाहिजे अशी अतंरिक तळमळ होत रहाते… हे सर्व या खलनायकी पात्रामुळे. फार पूर्वी पासून चित्रपटातील खलनायक दाखयवायचा असला की त्याची वेषभूषा किंवा रंगभूषा काहीशी बटबटीत दाखविली जात असे. कारण त्यांची खल प्रवृत्ती स्पष्टपणे प्रेक्षकांच्या लक्षात यावी ही अपेक्षा. नंतर मात्र काळानुसार यात बदल होत गेले व खलनायकही व्हाईट कॉलर व सभ्य परंपरेतील दिसू लागले. मात्र एक अभिनेता याला अपवाद होता. त्याने पारंपांरीक खलनायकाच्या सर्व संकेतांना छेद दिला. धोतर कुडते, गंजी किंवा जाकिट, डोक्यावर टोपी किंवा साफा, हातात छत्री नाहीतर छडी, ओठांवर सामान्य मिशा व चालण्याची विशेष ढब….. अशा वेषातील या पात्राची निव्वळ सावली जरी पडद्यावर दिसली तरी लोक या अभिनेत्याला सहज ओळखत असत….

Manache Talks१९७०-७५ चे दशक असावे. दादरच्या शिवाजी नाट्य मंदिरात कट्यार “काळजात घुसली” या संगीत नाटकाच्या प्रयोगाच्या मध्यतंरात निर्मात्याने एका प्रेक्षकाचा विशेष सत्कार केला. या सत्कार मूर्तीचे वैशिष्ठय म्हणजे हा पक्का बनारसी हिंदी भाषिक होता. मग याचा या संगीत मराठी नाटकाशी काय संबंध? ही बातमी मी त्याकाळात जेव्हा वाचली होती तेव्हा मलाही हा प्रश्न पडला होता. तर हा नाटक वेडा माणूस मुंबईत जेव्हा जेव्हा या नाटकाचे प्रयोग होत असत तेव्हा तेव्हा समोरच्या रागेंत हमखास दिसत असे. या नाटकाचे सर्वाधिक प्रयोग या माणसाने बघितले होते म्हणून हा सत्कार होता. रंगभूमिच्या प्रत्येक घटकाचा कधी ना कधी सत्कार होत असतो पण प्रेक्षकाचा असा सत्कार मला वाटतं नाट्यसृष्टीतले अपवादात्मक उदाहरण असावे.

वाराणशीच्या “सनातन धरम नाटक मंडळी”चे व्यवस्थापक पंडित भैरोदत्त चौबे यानां सर्वजण चौबेजी याच नावाने ओळखत असत. त्यांचा मुलगाही त्यांच्या सोबत तिथे जाई आणि नाटकावाल्यानी सांगितलेले कोणतेही काम करत असे. मात्र चौबेजीना आपल्या मुलाने नाटक कंपनीशी कोणताच करार न करता अशी केलेली कामे अजिबात आवडत नसत. १६ वर्षांचा झाल्यावर मग या मुलाने लिखाण करायलाही सुरूवात केली. मधून मधून छोट्या भूमिकाही करू लागला. वडिलांच्या मृत्यू नतंर संकटप्रसाद या त्याच्या मोठ्या भावाने काही काळ नाटक कंपनी चालविण्याचा प्रयत्न केला खरा पण त्यात ते यशस्वी नाही झाले. शेवटी त्यानी या सर्वावर पडदा पाडला आणि चित्रपटात काही आजमावता येईल या आशेने मुंबईची वाट धरली.

Kanhaiyalalकोणत्याही कलेचा भूंगा एकदा का डोक्यात गेला की तो मेंदू सतत कुरतडत असतो. पंडित चौबेजीच्या एका मुलाने मुंबईची वाट धरली मग या दुसऱ्याला कसे बांधून ठेवणार? सुरूवातील किराणा दुकानात बसवून बघितले पण याच्या डोक्यात वेगळेच “किराणा” घराणे !!! नाटक, संगीत, लिखाण या त्रयीने याचा ताबा घेतला. “पंधरह अगस्त्” या नावाचे एक नाटक लिहून त्याने ते बसवले. “मुंबईत प्रयोग केला तर काही मार्ग नक्की सापडेल’’ म्हणून नाटकाचा प्रयोग मुंबईत करायचा ठरवले. पण येथल्या सेंसार बोर्डाने त्याला चांगलाच झटका दिला व बऱ्यापैकी नुकसान सोसावे लागले. या नाट्यवेड्या तरूणाचे नाव कन्हैयालाल चतुर्वेदी. त्याला चार वेदांचे ज्ञान होते की नाही महित नाही पण त्याच्याकडे चौकस बुद्धी व चौरस वृत्ती मात्र निश्चीतच असावी…. या माया नगरीत आपले स्थान बळकट करायला याच गोष्टींचा तर उपयोग झाला.

नाटकाने काहीसे निराश केले मग किमान चित्रपटात काही करता येईल या आशेने मग हा पंडित कन्हैयालाल चतुर्वेदी नावाचा तरूण चित्रपटाकडे वळला. १९३९ मध्ये “एक ही रास्ता” या चित्रपटात “बांके’’ नावाची व्यक्तीरेखा साकार करण्याची पहिली संधी त्याला मिळाली. मेहबूब खान हे या चित्रपटाचे दिग्दर्शक होते आणि चित्रपटाचा नायक होता अरूणकुमार आहूजा म्हणजे आपल्या गोविंदाचे पिताश्री. या चित्रपटाच्या पडद्यावर पहिल्यांदाच “पंडित कन्हैयालाल चतुर्वेदी” या लांबलचक नावाला कात्री लावून फक्त “Kanhaiyyalal” हे नाव झळकले आणि या नावाने मग भारतीय हिंदी चित्रपटसृष्टीत आपली मोहर उमटविली.

manache talksवर मी जो “संगीत कट्यार काळजात घुसली” या नाटकाच्या उल्लेख केला तो सत्कारमूर्ती प्रेक्षक म्हणजे अभिनेते कन्हैयालाल होत. लेखाच्या सुरूवातीला ज्या खलनायकाच्या सावली बद्दल सांगितलेय त्याचे मानकरीही हेच कन्हैयालाल. खरा अतरंगी अभिनेता. भारतीय चित्रपटसृष्टीचे एक अनोखे वैशिष्ठ्य म्हणजे इथे जो ज्या प्रदेशातुन येतो सोबत तिथल्या मातीचा दरवळ घेऊनच येतो. दिग्दर्शक मेहबूब खान यानां त्यांच्या पूढच्या चित्रपटाचा अस्सल गामीण खलनायक मिळाला होता. १९४० मध्ये मेहबूब खानचा “औरत” हा चित्रपट झळकला. यातली सुखीलाला या सावकाराची खल नायकी अदा कन्हैयालाल यांनी अशी काही पेश केली की मेहबूब खान प्रचंड प्रभावित झाले.

खरं तर “औरत” मध्ये आणखी काही तरी सांगण्या सारखं आहे असं मेहबूब खान याना सतत वाटे. १७ वर्षा नंतर त्यांनी “औरत” चित्रपटाचा रिमेक करण्याचे नक्की केले. तो पर्यंत चित्रपटसृष्टीतही खूप काही बदलले होते. मेहबूब खान यांनी अभिनेते, संगीतकार, गीतकार यांची पूर्ण नवीन टीम तयार केली. यात फक्त बदलले नाही ते सुखीलाला हे पात्र अर्थात कन्हैयालाल..१९५७ मध्ये आलेल्या या रिमेकने म्हणजे “मदर इंडिया”ने अनेक विक्रम रचले. कन्हैयालाल भारतातील प्रत्येक घरात पोहचले ते याच चित्रपटाने.

कन्हैयालाल यांनी जितक्या भूमिका केल्या त्यात ते अभिनय करत आहेत असे वाटायचे नाही इतकी सहजता होती. त्यांनी केलेल्या व्यक्तीरेखा या आतुन बाहेरून एकजीव होत असत. अगदी पाया पासून केसा पर्यंत आपल्या शरीराच्या सर्वच अवयवां कडून ते अभिनय करून घेत. मग ती व्यक्तीरेखा खलनायकी असो की प्रेमळ. खरं तर मदर इंडियातील एकट्या “सुखीलाला” या पात्रात लफंगा, ठग, कंजूष, कठोर, बदमाश, लालची, चलाख, बायकांवर डोळा ठेवणारा बेरकी, नफेखोर या सर्वच छटा रंगविल्या. यातील प्रत्येक छटा त्यांनी अत्यंत बारकाव्याने साकार केली. पहिल्या प्रसंगातील घोड्यावर बसून येणारा सुखीलाला ते सरते शेवटी डाकू बीरजू समोर किड्या सारखा रेंगत आणि विव्हळत जाणारा सुखीलाला…काय ताकदीने साकारलाय या अभिनेत्याने.!!! माणूस एकाच वेळी फक्त कृष्ण धवल या रंगाचा नसतो तर त्याच्या असंख्य ग्रे छटा असतात हे अभिनेत्याने पूरते ओळखले होते.

५० च्या दशकातील त्यांचे खलनायकी बाजाचे चित्रपट असो की प्रेमळ….. पडद्यावर येताच ते प्रसंग जीवतं करण्याचं कसब त्यांच्याकडे होतं. मग समोर कोणताही व कितीही मोठा अभिनेता असो. त्यांचा वावर सहज असे. काही तरी ओढून ताणून ते करत आहेत असे अजिबात वाटत नसे. “मि.सपंत” मधील त्यांचा नकली तूप विकणारा शेठ माखनलाल, “लाल हवेली’ मधील विनोदी पंडित चाचा, “मल्हार“ मधील कन्हैयालाल याच नावाची व्यक्तीरेखा, “एक ही रास्ता” मधील बाँके, बिमल रॉय यांच्या “नोकरी” तील लॉज मधील नोकर हरी, “फुलों की सेज” मधील बनवारी, “बिरादरी” मधला विनोदी बाजाचा दूधवाला राम मूर्ती, देवदास (१९५५ दिलीपकुमारचा) मधील बेरकी पंडित, गुरूदत्तच्या “भरोसा” मधील श्रीमंत मालकाचा बेईमान सेवक रौनकलाल, “बंधन” मधील व्याजखाऊ मलिकराम, “जीवन मृत्यू” मधील शेट जगत नारायण, “होली आयी रे” मधील वाईट नजरेचा लाला अनोखेलाल, धमेंद्रच्या “दोस्त” मधील सशंयी नवरा घडीबाबू, “दुश्मन” मधील दुर्गाप्रसाद, “गंगा जमुना” मधील मुनीम कल्लू, ”उपकार” मधील लाला धनीराम, “राम और श्याम” मधील लोचट मुनीम, “हम पाँच” मधील जहागिरदाराचा चमचा, “धरती कहे पूकार” के मधील आपल्या लहान भावांवर जीवापाड प्रेम करणारा मोठा भाऊ, “अपना देश” मधील भ्रष्ट अणि खूनात मदत करणारा सेवाराम…………१०० पेक्षा अधिक चित्रपटातुन अभिनय करणारे कन्हैयालाल यांनी प्रत्येक भूमिकेत आपली छाप सोडली आहे.

Kanhaiyalalत्यांच्या अनेक भूमिका त्याच त्या होत्या तरीही त्यांचे सादरीकरण, संवाद बोली, देहबोली अशी काही असायची की पडद्यावरील त्यांचे प्रसंग कधी कंटाळवाणे वाटत नसत. इतर पात्रांचे संवाद सुरू असतानां त्यांच्या प्रतिक्रिया देखील तितक्याच उस्फूर्त असत. त्यांचे संवाद अनेकदा लाऊड होत असत यावर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले होते- “होय माझे संवाद अनेकदा तार स्वरात असतात कारण मी वास्तवात अशी अनेक माणसे बघितली जी कारण नसतानां विवा प्रकारचे हेल काढून उंच स्वरात बोलत व आपले महत्व टिकविण्याची धडपड करीत.” एका चित्रपटात ते प्रसिद्ध अभिनेते मोतीलाल यांच्या वडिलांच्या भूमिकेत होते. संवाद खूप लाबंलचक असल्यामूळे ते एका मोठ्या कागदावर मोठ्या अक्षरात लिहून लांबून वाचत असत. त्यामुळे युनिट मधील अनेकजण त्यांच्यावर हसत देखिल. पण नतंर ते अशा संवादात माहिर झाले.

सन १९३९ मध्ये त्यांनी “साधना” नावाच्या चित्रपटात आजोबाची भूमिका साकारली होती. त्यावेळी ते फक्त २९ वर्षाचे होते. या चित्रपटातील त्यांचा नातू होता प्रेम अदीब जो की २२ वर्षाचा होता. हा चित्रपट सिल्व्हर ज्युबिला ठरला. या चित्रपटातील संवाद, आणि गाणी देखिल त्यांनी लिहली होती. त्यांच् वय जसं जसे वाढत गेले भूमिकांचेही वय वाढतचं गेलं. “औरत” चित्रपटाच्यावेळी मेकअपमन त्यांचे मेकअप करण्यास तयार नव्हते. तेव्हा छायाचित्रकार फरदुन इराणी यांनी त्यांचे मेकअपविनाच सुंदर शॉटस् घेतले जेव्हा की मेकअप नसेल तर छायाचित्रकार चित्रीकरणास तयार होत नसत. या चित्रपटाचे संवाद लेखक वजाहत मिर्झा यांनी अतिशय सुंदर संवाद कन्हैयालाल यांच्यासाठी लिहले आहेत. या दोघांचेही ऋण कन्हैयालाल नेहमीच मान्य करीत असत. अभिनया सोबत उत्कृष्ट संवाद असले की अभिनेते प्रेक्षकांच्या दीर्घकाळ लक्षात रहातात असे त्यांचे मत होते. मेहबूब खान यांना त्यांच्या प्रतिभेची कल्पना होती म्हणून त्यांच्या “बहन” नावाच्या चित्रपटात त्यांनी त्यांना प्रेमळ खिसेकापूची भूमिका दिली. तर “राधिका” आणि “लाल हवेली” नावाच्या चित्रपटात विनोदी पंडिताची भूमिका दिली.

“औरत” चित्रपटाच्या एका प्रसंगात त्यांच्या अंगावर घर कोसळते असा एक प्रसंग होता. या प्रसंगात ते बरेच जखमी झाले पण त्यांनी डॉक्टरानां न बोलावता प्रसंग पूर्ण करा असे सांगितले व प्रसंग ओके झाल्यावरच उपचार करून घेतले. या चित्रपटात राधा ही मूख्य भूमिका सरदार अख्तर यांनी केली होती ज्या मेहबूब खान यांच्या पत्नीही होत्या. हा चित्रपट गोल्डन ज्युबली झाला. १७ वर्षा नंतर जेव्हा या चित्रपटाचा रिमेक त्यांनी “मदर इंडिया’’ या नावाने बनविला तेव्हाही सुखीलाला ही भूमिका कन्हैयालाल यानीच केली. अशा प्रकारचे हे पहिलेच उदाहरण आहे. सुखीलाला नंतर जेमिनी संस्थेच्या १९६२ मध्ये आलेल्या “गृहस्थी” या चित्रपटातील त्यांची राम स्वरूप या स्टेशन मास्तची भूमिका त्यानां मना पासून आवडत असे. सुटाबुटात त्यांनी फारच कमी भूमिका केल्या त्यापैकी ही एक.

त्यांच्या बद्दल बोलताना सुनील दत्त एकदा म्हणाले होते की- “मी कॅमेऱ्याच्या मागे उभा राहून त्यांचा अभिनय बघत असे. तेव्हा कधी असे वाटतच नसे की हे अभिनय करत आहेत. अत्यंत विनम्र आणि साधा माणूस…” दिलीपकुमार सोबत त्यांनी अनेक चित्रपट केले. ट्रॅजेडी किंग दिलीप साहब पण म्हणत- “हा माणूस इतक्या अप्रतिमपणे संवाद म्हणून समोरच्या अभिनेत्यास प्रतिसाद देत असे की त्याच्याशी सामना करणे कठीण होत असे.” दुलाल गुहा दिग्दर्शीत “दुश्मन’’ चित्रपटात त्यांनी राजेश खन्ना सोबत काम केले आहे. त्याही वेळेस सुपर स्टार राजेश खन्ना म्हणाले होते- “ते नैसर्गिक अभिनय करत असत.” या चित्रपटातले त्यांचे “कर भला तो हो भला” हे पालूपद तेव्हा खूप गाजले होते. “गंगा जमुना’’ चित्रपटातील असेच आणखी एक पालूपद “राम बचाये कल्लू को अंधा करदे लल्लू को” हे पण खूप गाजले. त्यांच्या तोंडून भsयीsssया…हा लांबलचक हेल खूप छान वाटे. लोचटपणाचा अभिनय तर ते फक्त डोळ्यातुन साकार करत. त्यांच्या त्या छपरी मिशा, त्यांचे पान खाऊन संवाद म्हणणे सर्वच कसे नैसर्गिक असे. ते एक उत्तम कवी, कथाकार व संगीताचे जाणकार होते. सामजिक विषयावर कविता करायला त्यानां आवडत असे. आपल्याकडील अनेक कथाकल्पना त्यांनी शेअर केल्या लपवून न ठेवता. स्वत:च्या घरात देखिल ते धोतीकुर्ता व बनियन अशा खास बनारसी ढंगात वावरत असत.

Kanhaiyalalबनारसी पान आणि बनारसी पंडे याचा एक अनोखा संगम या अभिनेत्यात होता. खरं तर अभिनय करणे म्हणजे सोंग वठवणे. हे सोंग खरे की खोटे हे कदाचित नक्की सांगता येणार नाही मात्र चांगले की वाईट हे सांगता येते आणि कन्हैयालाल हे सोंग उत्कृष्ट वठवित असत. रूढ अर्थाने ते फारसे शिकलेले नव्हते. एखद्या महाविद्यालयाच्या पदवीचे कागद त्यांच्या भितींवर फ्रेम करून टांगलेले नव्हते पण त्यांच्या वाट्यास आलेल्या चित्रपटाच्या प्रत्येक फ्रेम मध्ये मात्र ते आपल्याला खिळवून ठेवत. १९५८ मध्ये “सहारा” नावाचा चित्रपट आला होता. मीना कुमारीने यात आंधळ्या नायिकेची भूमिका साकारली होती. सुखवस्तू चौधरी गमनसिंग ते फाटका गमनसिंग असा प्रवास असलेली ही व्यक्तीरेखा त्यांनी अप्रतिम साकारली आहे… या चित्रपटात तो अनेक भिकाऱ्यानां मोबदल्यात जेवू घालतो. कुणी आठ आणे तर कुणी बारा आणे देतात व हा चौधरी त्यानां त्यांच्या लायकी प्रमाणे जेवण देतो…या प्रसंगात एक भिकारी त्यानां एक रोटी अधिक द्यायची विनंती करतो….पण त्याची कमाई कमी असल्यामुळे चौधरी देत नाही….यावर भिकारी म्हणतो- “मला मेहनत मजदूरी करता आली असती तर दहा रूपये दिले असते’’…यावर चौधरी म्हणतो- ‘’मेहनत मजदूरीसाठी खूप रक्त आटवावं लागतं..ते इतकं सोप्प नाही…’’.या संवादातील कन्हैयालाल यांचा अभिनय अप्रतिम आहे. समाजातील एक वास्तव किती सहजपणे ते सांगून करून जातात……

१९८२ मध्ये “हथकडी” या चित्रपटातुन त्यांनी आपल्या अभिनयाचे शतक पूर्ण केले तेव्हा ते ७२ वर्षांचे होते.नाटकाच्या वेडापायी ते मुंबई नगरीत दाखल झाले त्यावेळी त्यांनी “१५ अगस्त” नावाच्या नाटकाचे प्रयोग केले होते. काय योगायोग पहा १९८२ मध्ये जेव्हा त्यांनी देह ठेवला तेव्हा १४ ऑगस्टची तारीख होती…..फक्त एकाच दिवसाचा फरक…वर्तुळ पूर्ण करून गेले…या चतुरस्त्र अभिनेत्याला मन:पूर्वक अभिवादन.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय