बॉर्डर चित्रपटातील सनी देओलच्या भूमिकेतील मेजर कुलदीपसिंग चंदपुरी

जगाच्या युद्धाच्या इतिहासात आजवर जितक्या लढाया झाल्या असतील त्यात सैनिकांच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या अनेक आहेत.

सैनिकांचं शौर्य, पराक्रम, देशाभिमान आणि अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही आपल्या देशासाठी संपूर्ण समर्पण करून आपल्या देशांच्या सीमांचं रक्षण करणाऱ्या अशा अतितटीच्या लढायांमध्ये लोंगेवाला इथे भारत आणि पाकिस्तान मध्ये झालेली लढाई इतिहासात सुवर्ण अक्षरांनी कोरलेली आहे.

१२० विरुद्ध २००० – ३००० अशी विषमता असताना तसेच ५० पेक्षा टी-५९ हे चायनीज बनावटीचे रणगाडे त्याशिवाय प्रचंड दारुगोळा शत्रूकडे असताना भारताच्या त्या जांबाज एकशेवीस सैनिकांनी नुसती आपली चौकी लढवली आणि वाचवली नाही तर शत्रूला चारी मुंड्या चीत करताना त्याची अक्षरशः अब्रू लुटली असं म्हंटल तरी वावगं ठरणार नाही.

पाकिस्तानी सैनिकांनी घाबरून ह्या युद्धातून पळ काढला. लोंगेवाला युद्धात २०० पेक्षा जास्त पाकिस्तानी सैनिक मारले गेले.

३६ टी–५९ रणगाडे उध्वस्त झाले. ५०० पेक्षा जास्त तोफा असलेल्या गाड्यांचं नुकसान झालं. त्याच वेळेस भारताने २ सिंहांना गमावलं.

भारताच्या सैनिकांचं नेतृत्व करणाऱ्या ‘मेजर कुलदीपसिंग चंदपुरी’ ह्यांना महावीर चक्राने सन्मानित करण्यात आलं तर पाकिस्तानी सैनिकांचं नेतृत्व करणाऱ्या ‘जनरल मुस्तफांवर’ चुकीचे निर्णय घेतल्या बद्दल खटला भरवण्याची शिफारस केली गेली.

कुलदीपसिंग चंदपुरी

१९७१ चं भारत पाकिस्तान युद्धाचं पारडं भारताच्या बाजूने फिरवण्यात लोंगेवाला इकडे त्या एकशेवीस सैनिकांनी गाजवलेला भिमपराक्रम कारणीभूत होता.

१९७१ च्या युद्धात भारत बचावात्मक स्थितीत होता. ४ डिसेंबर १९७१ च्या रात्री पाकिस्तानी सैनिकांनी भारताच्या लोंगेवाला पोस्ट वर हल्ला केला.

त्यावेळेस मेजर चंदपुरी ह्यांच्यावर ह्या पोस्टच्या रक्षणाची जबाबदारी होती. २३ पंजाब रेजिमेंट (सिख) आणि बॉर्डर स्क्युरीटी फोर्स चे काही जवान मिळून फक्त १२० लोकं होती.

मेजर चंदपुरी ह्यांना हल्ल्याची खबर लागताच त्यांनी बटालियन हेडक़्वारटर कडून मदत मागितली. पण सकाळ होईपर्यंत मदत देण्यास तिकडून नकार आला. अश्या वेळेस दोन पर्याय मेजर चंदपुरी ह्यांच्याकडे होते.

एकतर पाकिस्तानी सैन्यापुढे नमतं घेऊन आपल्या १२० सानिकांसोबत रामगढ पोस्ट कडे कूच करणं. पण ह्याचा सरळ अर्थ होता भारताने युद्धात मात खाल्ली.

दुसरा पर्याय होता आपली पोस्ट शेवटच्या श्वासापर्यंत लढवण्याचा.

“बचेंगे तो ओर भी लढेंगे” ह्या उक्तीला जागत त्यांनी दुसरा पर्याय आपलासा केला.

आपली पोस्ट वाचवण्याचा निर्णय तर मेजर चंदपुरी ह्यांनी घेतला पण समोर आव्हान खूप मोठं होतं. पाकिस्तानच्या त्या सैन्य ताकदीपुढे ते एकशेवीस भारतीय सैनिक कुठेच नव्हते. ही लढाई म्हणजे डेव्हिड आणि गॉलीअथ मधली लढाई होती.

युद्ध हे फक्त भावनांनी लढलं जात नाही. त्यात तुम्हाला काही निर्णय योग्य वेळी घ्यावे लागतात. त्या निर्णयावर युद्धाचा शेवट कोणाच्या बाजूने होणार हे ठरलेलं असते.

भारताच्या बाजूने मेजर चंदपुरी ह्यांनी भारतीय सैनिकांना संघटीत करून अतिशय कौशल्याने पाकिस्तानी सैनिकांना नेस्तनाबूत केलं. भारतीय सैनिकांनी पाकिस्तानी सैन्याच्या फ्युल टँकर ला लक्ष केलं.

ह्याच्या स्फोटात निर्माण झालेल्या प्रकाशात त्यांनी पाकिस्तानी सैन्याला आपलं लक्ष केलं. भारताची ही पोस्ट वाळूच्या टेकडीवर होती.

त्यामुळे भारतीय सैनिक उंचावरून पाकिस्तानी सैनिकांना लक्ष करू शकत होते. ह्या स्फोटात निर्माण झालेल्या धुरामुळे पाकिस्तानी सैनिकांना भारतीय पोस्ट मधील सैनिकांच्या जागेचा अंदाज येत नव्हता.

मेजर चंदपुरी ह्यांनी हवाई दलाची मदत आधीच मागवून ठेवली होती. रात्रीच्या वेळी काम करणारी रडार नसल्याने भारतीय वैमानिकांना सकाळ होण्याची वाट बघण्यापलीकडे दुसरा पर्याय नव्हता.

तिकडे पाकिस्तानी सैनिक आणि एकूणच ह्या हल्ल्यातील चुका भारतियांच्या पथ्यावर पडल्या. पाकिस्तानी सैनिकांनी ह्या पोस्टच्या आजूबाजूच्या भौगोलिक स्थितीचा अभ्यास केला नव्हता.

तसेच पाकिस्तानी सैनिकांकडे असलेले टी-५९ रणगाडे ह्या वाळूतून जाण्यास सक्षम नव्हते. त्यामुळे ह्या भागात रणगाड्यांच वहन करण्यात अतिशय मर्यादा आल्या त्यात पाकिस्तानी जनरल ने भारताच्या पोस्ट पुढे असलेल्या ताऱ्यांच्या कुंपणापलीकडे सुरुंग असल्याचा अंदाज बांधला व तब्बल २ तास पाकिस्तानी सैन्य भारताच्या दिशेने पुढे जाण्यास कचरत होतं.

त्याचवेळी पाकिस्तानी आर्मी आणि हवाई दलात समन्वय नसल्याने पाकिस्तानी हवाई दलाने कुठलीही मदत करण्यास नकार दिला.

इकडे सकाळच्या पहिल्या किरणांन सोबत एअर कंट्रोलर मेजर आत्मा सिंग ह्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय हवाई दलाच्या विमानांनी पाकिस्तानी वर हमला केला.

आधी आपली पोस्ट वाचवण्यासाठी लढणाऱ्या त्या एकशेवीस सैनिकांनी मग पाकिस्तानी सैन्यावर जिंकण्याच्या इर्षेने हमला केला. हवा आणि जमीन अश्या दोन्हीकडून झालेल्या हल्याने पाकिस्तानी सैनिकांना पळता भुई थोडी झाली.

भारताने अभूतपूर्व अश्या विजयाची नोंद इतिहासात सोनेरी अक्षराने केली. ३६ टी-५९ रणगाडे उध्वस्थ किंवा पकडण्यात आले. दुसऱ्या महायुद्धा नंतर कोणत्याही युद्धात इतक्या मोठ्या संखेने आजवर कोणीही इतके रणगाडे गमावले नव्हते.

त्या एकशेवीस लोकांनी पाकिस्तान चा नुसता पराभव केला नाही तर त्यांच्या नाकावर टिच्चून त्यांच्या कानफटात मारली. ह्या लढाई नंतर १९७१ च्या भारत पाकिस्तान युद्धात पाकिस्तान ने माती खाल्ली हा इतिहास आहे.

आज त्या एकशेवीस लोकांची आठवण भारतीयांना नाही ह्याची खंत वाटते. आपल्या लीडरशिप आणि अतुलनीय शौर्याने ह्या एकशेवीस सैनिकांचं नेतृत्व करणारे ब्रिगेडियर कुलदीपसिंग चंदपुरी ह्यांची आठवण करून द्यायला बॉर्डर चित्रपटाचा दाखला द्यावा लागतो हे केवढ मोठं आपलं दुर्दैव.

काही दिवसांपूर्वी ब्रिगेडियर कुलदीपसिंग चंदपुरी ह्यांना मरण आलं तेव्हा सगळीकडे त्यांची ओळख सांगताना लोक सनी देओल ची आठवण करून देत होते.

ज्यांच्यावरून आपण सनी देओल ला ओळखायला हवं तिकडे आज उलट परिस्थिती आहे. आपण नको त्यांना हिरो बनवतो आणि खरे हिरो काळाच्या पडद्याआड गेल्यावर त्यांची आठवण होते. त्या एकशेवीस सैनिकांना आणि त्याचं नेतृत्व करणाऱ्या ब्रिगेडीअर कुलदीपसिंग चंदपुरी ह्यांना माझा सलाम.

ब्रिगेडियर कुलदीपसिंग चंदपुरी ह्यांच्या जाण्याने भारताने आज एक चाणाक्ष लिडर, पराक्रमी सैनिक आणि एक देशभक्त गमावला आहे. आजचा लेख त्यांच्या स्मृतीस अर्पण.

वाचण्यासारखे आणखी काही…

व्यक्तिमत्व
पालकत्व
प्रेरणादायी/MOTIVATIONAL

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी ८३०८२४७४८० या नम्बरवर ‘अपडेट्स’ असा व्हाट्स ऍप मेसेज करा.

Manachetalks

'रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

'रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!