लोक लग्न का करतात? बदलत्या जमान्यानुसार जोडीदार शोधणं कठीण का झालं?

लोक लग्न का करतात?

असं म्हंटल जातं कि ‘शादी एक ऐसा लड्डू है, जो खाये तो पछतायें और ना खाये तो भी पछतायें’ आज आपण या लेखात अगदी बेसिकली लग्न करण्याची कल्पना ते या डिजिटल जमान्यात जुळणारी लग्न आणि मॉडर्न रोमान्स याबद्दल बोलू.

जोडीदार शोधणं

मागच्या काही पिढ्यांत केली जाणारी लग्न किंवा रोमान्स काहीसा वेगळा होता. त्याची काही कारणं होती. लोकांकडे मोबाईल्स नव्हते. तेव्हा लोकांचं जग छोटं होतं. त्यामुळे कोणी प्रेमात पडायचं तर ते आपल्या आसपासच्याच कोणाच्यातरी!! किंवा ठरवून लग्न होण्याचा विषय सुद्धा तसाच होता, म्हणजे आसपासच्याच लोकांमध्ये. एकतर दूरच्या लोकांशी संबंध वाढवायची भीती होती किंवा तेवढी पोहोच सुद्धा नसायची.

१९३२ मध्ये अमेरिकेच्या फिलाडेल्फियामध्ये केलेल्या एका सर्व्हेनुसार सहा मध्ये एका व्यक्तीने आपल्याच कॉलनीमध्ये कोणाशीतरी लग्नगाठ बांधली होती. असा काही रिसर्च भारतात तर झाला नव्हता पण आपण साधारण कल्पना करू शकतो कि त्या काळात भारतात असा सर्व्हे झाला असता तर अशीच आकडेवारी मिळाली असती.

आता याच गोष्टीची आपण आजच्या काळाशी तुलना केली तर, अशा किती लोकांना आपण ओळखतो ज्यांनी फक्त जवळ राहायचे म्हणून लग्न केली किंवा जवळच राहायचे म्हणून ते एकमेकांच्या प्रेमात पडले!!… जास्त नसणार थोडेच अपवादात्मक किस्से असे सापडतील.

आताच्या दिवसांत विमानं, ट्रेन अशी दळणवळणाची माध्यमं किंवा त्याहीपेक्षा महत्त्वाचा आपल्या हातातला स्मार्टफोन यामुळे दुसरी शहरं, राज्य एवढंच काय दुसऱ्या देशातसुद्धा लग्न जमवली जातात एवढंच नाही तर काही जोडपी आकंठ प्रेमात सुद्धा पडतात.

याशिवाय पूर्वीच्या काळात लग्न कमी वयातच व्हायची, म्हणजे करवून दिली जायची. १९७१ साली भारतात लग्नाचं सरासरी वय हे १७ होतं आज ते २५ ते २६ च्या दरम्यान आहे. शिवाय त्या काळात मुलींना शिक्षण पूर्ण करण्याची सुद्धा वेळ दिली जात नव्हती. कमी वय असल्याने त्या काळात लग्नाच्या वेळी मुला-मुलींची किंवा वधू-वरांची आपली स्वतःची अशी काही आवड निवड असतंच नव्हती. त्यामुळे जोडीदार हा आईवडिलांच्या पसंतीचा असायचा. आईवडिलांची पसंती म्हणजे जावई म्हणून कमावता आणि चांगल्या घरातला मुलगा आणि सून म्हणून घर सांभाळणारी, कुटुंबाचं, पै-पाहुण्यांचं करणारी मुलगी एवढाच निकष असायचा. आता हि झाली मागच्या काही पिढ्यांमध्ये होणाऱ्या लग्नाची गोष्ट.

पूर्वी लोक लग्न यासाठी करायची कि आईवडिलांवर समाजाचं प्रेशर असायचं कि तुमचा मुलगा किंवा मुलगी एवढी मोठी झाली पण अजून लग्न कसं बरं नाही झालं!! आता आपण जर जुन्या लोकांना विचारलं कि तुम्ही लग्न का केलं किंवा जोडीदारात लग्नासाठी काय असावं असं तुम्हाला वाटत होतं?? तर पुरुषांचं उत्तर साधं असं असतं कि माझं घर सांभाळणारी, मुलांना सांभाळणारी बायको मला हवी होती. तर स्त्रियांचं उत्तर हे कि चांगली नोकरी असलेला नवरा एवढं माझ्यासाठी पुरे होतं.

लोक लग्न का करतात?

पण आता मात्र काळ बदलला तशीच लग्न करण्याची कारणं आणि जीडीदारासाठीचे निकष पण बदलले. आता फक्त एवढ्यासाठी मुलं-मुली लग्न नाही करत, कि ती जेवण बनवू शकली पाहिजे, मुलं नीट साम्भाळू शकली पाहिजे किंवा तो चांगला पैसे कमावून घर चालवू शकला पाहिजे. तर त्यांचे विचार काही पक्के ठरलेले असतात. विचारच नाही तर त्यांचे स्वप्न असतात कि माझी ‘बेटरहाफ़’ अशी असावी किंवा माझा ‘सोलमेट’ मला समजून घेणारा असावा. एखाद्या नवीन लग्न झालेल्या जोडप्याला जर विचारलं कि तुम्ही एकमेकांशी लग्न का केले तर त्यांची उत्तरं नक्कीच यापेक्षा वेगळी असतील कि हिने घर सांभाळले पाहिजे आणि याने चांगली नोकरी करून घरासाठी लागणारा पैसा कमावला पाहिजे. आजची पिढी समाजाच्या किंवा घरच्यांच्या प्रेशरने लग्न न करता आपल्या जोडीदारासाठी त्यांचे विचार किंवा अपेक्षा या ठरलेल्या असतात.

याशिवाय आता जोडीदार शोधण्याचे पर्याय सुद्धा विस्तारत गेले ते इनरनेट मुळे!! वेगवेगळ्या मॅट्रिमोनीसाईट्स मुळे आपलं शहर किंवा राज्यच नाही तर साता समुद्रापारचा जोडीदार शोधण्याकडे सुद्धा नव्या पिढीचा कल असतो. शिवाय वाढत्या सोशल नेटवर्किंगच्या प्रभावामुळे मॉडर्न रोमान्स हा विषय तर जुन्या लोकांच्या आकलनापलीकडे गेला.

खरंतर इथेच गोष्टी जरा कॉम्प्लिकेटेड पण होतात. करणं प्रेमासाठी लग्न करणं, समजून घेणारा जोडीदार हे सगळं ऐकायला आणि ऐकवायला तर छान वाटतं. पण इथेच जाहीर-अजाहीर अशा अपेक्षा सुरु होतात. जोडीदार समजूतदार असावा, विश्वासार्ह असावा, त्याचा किंवा तिचा ‘सेन्स ऑफ ह्युमर’ चांगला असावा, हुशार असावा, मित्र किंवा मैत्रीण म्हणून वागवणारा असावा, सेक्स पार्टनर म्हणूनही चांगला असावा वगैरे वगैरे…. पण एकाच व्यक्तीकडुन एवढ्या अपेक्षा खूप जास्त झाल्या आणि शिवाय हे आणखी कठीण होऊन बसतं जेव्हा समोरची व्यक्तीपण अशाच भरमसाठ अपेक्षा ठेऊन असते.

आता काळ बदलला तशी जोडीदार शोधायची प्रक्रियापण कॉप्लिकेटेड होऊन गेली. पूर्वी कॉलेजमध्ये, कॉलनीत मुलगा मुलगी भेटले प्रेम झालं, ते निभावलं आणि घरच्यांच्या संमतीने किंवा संमतीशिवाय लग्न केलं किंवा कांद्यापोह्यांचा कार्यक्रम ठेऊन लग्न जमवलं इतकं साधं हे प्रकरण होतं. पण आता अपेक्षा वाढल्याने पार्टनर शोधणं हे मुलामुलींसाठी आणि पालकांसाठी सुद्धा कठीण होऊन बसलं.

तर अशी हि लग्नाची गोष्ट. लग्न जमवेपर्यंतचा तो काळ ‘रोलर कोस्टर’, लग्न जमलं कि त्या लग्नात प्रिन्स आणि प्रिन्सेस दिसावं यासाठी नवरा नवरीचे प्रयत्न, घरच्यांची लग्नकार्यासाठी लगबग…. आणि एकदाचं लग्न झालं कि पुन्हा संसार चालवण्याचं ‘रोलर कोस्टर’!!!…. चला तर मग कमेंटमध्ये तुमचे लग्नाचे आणि आयुष्यातल्या रोलर कोस्टरचे अनुभव सांगायला विसरू नका…


या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.

Manachetalks

'रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

'रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!