माहित आहे का एव्हरेस्ट शिखर सर करण्याचं हे वास्तव?

एव्हरेस्ट सर करण्याचं स्वप्न नक्कीच बघावं पण ते पूर्ण करण्यासाठी आपण योग्य प्रशिक्षण, आपली मानसिक- शारीरिक क्षमता, आपलं वय तसेच अतिउंचीवर आपलं शरीर आपल्याला साथ देऊ शकते का ह्याचा अभ्यास केल्याशिवाय जाणं म्हणजे एवरेस्ट च्या बाजारातील एक गिऱ्हाईक बनणं. हे नक्की कसं ते समजून घ्या या लेखात.

जगातील सर्वात उंच शिखर म्हणजे माउंट एव्हरेस्ट ज्याची उंची ८८४८ मीटर (२९,०२९ फुट) आहे. त्यावर चढाई करणं हे प्रत्येक गिर्यारोहकाचं स्वप्न राहिलेलं आहे.

१९५३ ला सर एडमंड हिलरी आणि शेर्पा तेनझिंग नोर्गे ह्यांनी पहिल्यांदा एव्हरेस्ट ला गवसणी घातली. त्यानंतर अनेकांनी ह्या उंच शिखराला सर केलं आहे. आजवर ४००० पेक्षा जास्त गिर्यारोहकांनी जगातील सर्वात उंच असं एवरेस्ट शिखर सर केलं आहे.

एकेकाळी मानवाच्या उत्तुंग स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी केलेली चढाई आता एक बिझनेस म्हणून नावारूपाला येत आहे. ह्या बिझनेस मध्ये ठराविक काळात जास्तीत जास्त गिऱ्हाईक शिखरावर नेण्याच्या नादात एवरेस्ट वर सध्या माणसांची गर्दी झाली आहे.

ही गर्दी इतकी जास्त आहे की ह्यात काहीजणांना आपला जीव गमवावा लागला आहे.

नुकतेच मुंबईच्या गिर्यारोहक अंजली कुलकर्णी ह्यांना एव्हरेस्टवर झालेल्या गर्दीमुळे आपला प्राण गमवावा लागला आहे.

एव्हरेस्ट

जगातील सगळ्यात उंच असणारं शिखर सर करण्याची इच्छा सगळ्यांच्या मनात असते. पण नुसत्या इच्छेने शिखरे सर होतं नसतात.

समुद्रसपाटी पासून तब्बल ८००० मीटरपेक्षा जास्त उंची गाठताना निसर्गात अनेक बदल घडतात. वातावरण, तपमान, हवेतील प्राणवायू म्हणजेच ऑक्सिजनचं प्रमाण खूप अत्यल्प होते ह्यामुळे ८००० मीटर वरील ह्या भागाला डेथ झोन असे म्हंटल जाते.

समुद्र सपाटीवर वातावरणाचा दाब हा जवळपास १०१३.२५ मिलिबार (१४.६९६ पी.एस.आय.) असतो.

पण हेच प्रमाण अति उंचीवर डेथ झोन मध्ये ३५६ मिलिबार (५.१६ पी.एस.आय.) इतकं खाली येते.

शरीराला लागणाऱ्या ऑक्सिजनपेक्षा हवेतून मिळणाऱ्या ऑक्सिजन ची पातळी कमी असल्याने शरीराला जर ऑक्सिजन मिळाला नाही तर शरीराचं नियंत्रण बिघडून मृत्यू ओढवायला वेळ लागत नाही.

आजवर ३०० पेक्षा जास्ती लोकांचा ह्यामुळे मृत्यू झाला आहे.

एव्हरेस्ट वर जाण्याचा खर्च जवळपास १ ते १.५ कोटी रुपयांच्या आसपास येतो.

नेपाळ सरकार प्रत्येक गिर्यारोहका कडून ११ हजार अमेरिकन डॉलर एवरेस्ट चढाईसाठी घेते. ह्या शिवाय शेर्पा, ऑक्सिजन नळकांडी, कपडे आणि इतर खर्च बघता अश्या मोहिमेचा खर्च जवळपास ५० ते ७० हजार अमेरिकन डॉलर च्या घरात जातो.

इतके पैसे खर्च करूनही मोहीम सफल होण्याची खात्री कोणीच देऊ शकत नाही. कारण कोणत्या वेळी कोणाला काय होईल ह्याचा अंदाज बांधण तितकचं कठीण आहे.

नेपाळ सरकारसाठी एव्हरेस्ट सोन्याची अंडे देणारी कोंबडी आहे तर तिथे राहणाऱ्या शेर्पांसाठी भाकरीचा अर्धा तुकडा.

वर्षातून काही दिवस होणाऱ्या मोहिमेतून प्रत्येक शेर्पा जवळपास २ हजार ते ५ हजार डॉलर कमवत असतो.

ह्या शिवाय पैसे असणाऱ्या सगळ्यांना घेऊन जाणाऱ्या कुत्र्यांच्या छत्र्यांप्रमाणे उगवलेल्या गिर्यारोहण संस्था.

एक-दोन अपवाद वगळता एव्हरेस्ट मोहीमेचं मार्केटिंग करून बक्कळ पैसे कमावणाऱ्या अनेक संस्था उघडल्या आहेत, हे अनेक गिर्यारोहक ही उघडपणे मान्य करतात.

आज ज्यांची १ ते २ कोटी रुपये मोजायची तयारी आहे त्या सर्वाना एव्हरेस्ट शिखरावर नेण्याचं आमिष अनेक संस्थान कडून दाखवले जाते.

एव्हरेस्ट

अनेकांना एव्हरेस्ट सर करण्यासाठी सह्याद्री मध्ये केलेलं दोन- चार किल्ल्यांवरचं गिर्यारोहण पुरेसं वाटतं. त्यातल्या त्यात एखादा हिमालयाच्या शिखरावर केलेला ट्रेक म्हणजे चेरी ऑन टॉप!! अजून काय हवं… पैसे मोजा चला एव्हरेस्टवर.

गिर्यारोहण आपल्याकडे साहसी खेळ म्हणून माहित असला तरी त्याचं शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घ्यावं लागतं ह्याची माहिती थोड्यांनाच आहे. एक वर्षाचे कोर्सेस ह्यासाठी शिकावे लागतात.

ज्यात खडतर प्रशिक्षण आणि आपल्या शारीरिक, मानसिक शक्तीचा कस लागतो. त्यातून तावून सुलाखून बाहेर पडल्यावर आपण हिमालयातील अश्या एखाद्या मोहिमांचा विचार करायला हवा.

जर आपण ह्या अग्निदिव्यातून बाहेर पडू शकत नसू तर इतर अनेक शिखरे किंवा डोंगर रांगा आपण पार करूच शकतो ज्याला अगदी साधे गिर्यारोहणाचे शिक्षण पुरेसे असते.

एव्हरेस्ट चा बाजार असा बनवला गेला आहे की तुम्ही फक्त पैसे मोजले की तुम्ही एवरेस्ट सर करू शकता हा आत्मविश्वास देण्याइतपत आज हा बाजार गेला आहे.

ऑक्सिजन सिलेंडर लावलं म्हणजे आपण कितीही उंचीवर चढाई करू शकतो हा फाजील आत्मविश्वास अनेकांना मृत्युच्या दाढेत नेत आहे. काही दिवसांपूर्वी एकाच दिवशी २०० जणांनी एव्हरेस्ट च्या शिखरावर एकदम चढाई केली.

ज्याचा परिणाम म्हणजे ७ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत ज्यात ४ भारतीय आहेत. योग्य नियोजन केले असते तर कदाचित हे प्राण वाचवता आले असते. ह्या २०० लोकांपेकी किती जणांनी गिर्यारोहणाचं शास्त्रशुद्ध शिक्षण घेतलं असेल ह्याचा विचार केला तर हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच गिर्यारोहक असतील.

म्हणजेच कोणतंही शिक्षण न घेता फक्त स्वप्न आणि पैश्याच्या जोरावर बाजारात ओढली गेलेली बाकीची मंडळी आहेत.

एव्हरेस्ट सर करणं हे स्वप्न बाळगणं ह्यात चुकीचं काहीच नाही. पण ते पूर्ण करण्यासाठी निवडलेला रस्ता मात्र निश्चित चुकीचा आहे. एव्हरेस्ट हे एकमेव शिखर नाही.

गिर्यारोहणाचा आनंद काय सह्याद्री मधल्या शिखरांवर येत नाही? की हिमालयातील इतर शिखरांवर जे सहज सर करता येण्याजोगे आहेत त्यांच्यावर येतं नाही?

एव्हरेस्ट सर करण्याचं स्वप्न नक्कीच बघावं पण ते पूर्ण करण्यासाठी आपण योग्य प्रशिक्षण, आपली मानसिक- शारीरिक क्षमता, आपलं वय तसेच अतिउंचीवर आपलं शरीर आपल्याला साथ देऊ शकते का ह्याचा अभ्यास केल्याशिवाय जाणं म्हणजे एवरेस्ट च्या बाजारातील एक गिऱ्हाईक बनणं.

एव्हरेस्ट वर होणारी माणसांची गर्दी पुढे कदाचित एवरेस्ट मोहिमांच अस्तित्व धोक्यात आणणारं आहे.

एव्हरेस्ट वर मृत्युमुखी पडलेल्या लोकांना खाली आणणे पण शक्य नसते त्यामुळे अनेक लोकांची प्रेतं अजूनही तशीच तिथे पडलेली आहेत. ग्रीन बुट्स नावाच्या एका गिर्यारोहकाचं प्रेत असंच प्रसिद्ध आहे.

ह्याशिवाय ऑक्सिजन ची रिकामी नळकांडी, इतर कचरा इथलं वातावरण अजून दुषित करत आहे. एवरेस्ट शिखर नाही तर अशी अनेक शिखरं आज ह्या बाजाराच्या विळख्यात सापडली आहेत.

एव्हरेस्ट

आयुष्याच्या उत्तरार्धात पैसा, मानसन्मान कमावून झाल्यावर काहीतरी तुफानी करण्यासाठी आज अनेकजण एव्हरेस्ट सर करण्यासाठी तयार होत आहेत.

पण गिर्यारोहण म्हणजे समाजसेवा नव्हे की आयुष्याच्या कोणत्याही टप्यावर आपण ती सुरु करू शकतो.

गिर्यारोहण हे एक शास्त्र आहे ज्याचा अभ्यास योग्य पद्धतीने करावा लागतो. तसेच अभ्यास केल्यावर पास होण्याची कोणतीही खात्री देता येत नाही.

तसेच अभ्यासक्रम पूर्ण झाला म्हणून लगेच बोर्डाच्या परीक्षेला बसण्याआधी चाचणी, त्यानंतर साहामाही तसेच प्रिलीम च्या परीक्षा दिल्यावर त्यातून योग्य ते चिंतन केल्यावर बोर्डाच्या म्हणजेच एव्हरेस्ट च्या परीक्षेचा विचार करावा.

कारण ह्यात नापास म्हणजे मृत्यूशी गाठ. एव्हरेस्ट च्या बाजारात अडकून न घेता आणि एव्हरेस्ट हेच अंतिम लक्ष्य न ठरवता गिर्यारोहण शास्त्रोक्त पद्धतीने शिकून एक चांगला / चांगली गिर्यारोहक होण्याचा प्रयत्न आपल्याला एव्हरेस्ट सारख्या अनेक शिखरांची सफर घडवून आणेल ह्या बद्दल माझ्या मनात शंका नाही.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीकिंवा तुमचे स्वतःचे लेखन मनाचेTalks वर प्रकाशित करण्याची इच्छा असल्यासयेथे क्लिक करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

1 thought on “माहित आहे का एव्हरेस्ट शिखर सर करण्याचं हे वास्तव?”

  1. Thank you Manache Talks. I like your every lekh. It’s very very inspirational and knowledgeable. Thank you for sharing.

    Reply

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय