एक करोड झाडे लावून जगवण्याचा वसा घेणारे दारीपल्ली रामय्या

काल एक जोक फेसबुक आणि वॉट्स अपवर खूप फिरत होता. एक ओढणी डोक्यावर ओढलेलं तरुण जोडपं समुद्र किनारी बसलेलं आहे निदान त्यांच्यासाठी तरी झाडे लावा असा काहीसा संदेश त्यातून दिला गेला होता.
आज जागतिक पर्यावरण दिवसाच्या निमित्ताने अनेकांना झाडांची आठवण झाली असेल. कारण आपल्या आठवणी काही विशिष्ठ दिवसांपुरत्या मर्यादित असतात.
तो दिवस मावळला की आठवणी पण त्या दिवसांसोबत अस्ताला जातात. पण ह्या वसुंधरेला सुजलाम आणि सुफलाम करण्याचं स्वप्न बघितलेले आणि नुसतं ते बघून न थांबता त्याला प्रत्यक्षात उतरवण्यासाठी एक, दोन नाही तर तब्बल एक कोटी पेक्षा जास्त झाडांची लागवड करणारं व्यक्तिमत्व आपल्या भारतात आहे ह्याची जाणीवही भारतीयांना आजच्या दिवशी नाही ही आपली शोकांतिका आहे.
दारीपल्ली रामय्या हे एक व्यक्तिमत्व, ज्यांची ओळख म्हणजे सायकल वरून जाणारा एक सामान्य माणूस. पण ह्यांची सायकल सर्वांपेक्षा वेगळी. ह्या सायकलवर असतात खूप साऱ्या वृक्षांची रोपटी.
त्यावर स्वार होणाऱ्या दारीपल्ली रामय्या ह्यांच्या खिशात असतात खूप साऱ्या झाडांच्या बिया. मग त्या सायकलवरून सुरु होतो तो ह्या वसुंधरेला सुजलाम सुफलाम करण्याचा एक प्रवास.

हा प्रवास सुरु झाला तो त्यांच्या लहानपणी. आपल्या आईला पुढच्या पावसाळ्यासाठी बियांची बेगमी करताना त्यांच्या लहान मनाने हेरलं. ह्या बियांच्या मध्ये एक सुप्त शक्ती आहे.
जेव्हा हे बीज धरणीला मिळते आणि त्याला पावसाची जोड मिळते तेव्हा त्यातून त्या दडलेल्या शक्तीचा साक्षात्कार आपल्याला झाडांच्या रुपात होतो.
इवलाश्या रोपट्यापासून सुरु झालेला प्रवास त्याला एका प्रचंड अश्या वृक्षात बदलवतो. ह्या सगळ्यांच्या मागे असते ते छोटं बी हे त्यांना लहानपणीच उमगलं.
ह्या वसुंधरेने दिलेलं वरदान जपण्याची जबाबदारी आपलीच आहे, हे मानत दारीपल्ली रामय्या ह्यांनी देवाला प्रसन्न करण्या एवढंच महत्व झाडे लावण्याला दिलं.
सामान्य माणसाने ठरवलं तर तो काही करू शकतो ह्याचा आदर्श दारीपल्ली रामय्या ह्यांनी जगापुढे ठेवला.
फक्त पैसा देऊन समाजसेवा करता येते असं नाही. ह्या वसुंधरेची सेवा एक सामान्य माणूस पण असामान्य रीतीने करू शकतो हे त्यांनी दाखवून दिलं.
एक सायकल, सोबतीला काही रोपटी, खिशात बिया, सायकल चालवणारे पाय आणि एका हाताने सायकल ला सांभाळत रस्त्याच्या दुतर्फा दारीपल्ली रामय्या हे बियांची लागवड करत गेले.
नुसते लागवड करून थांबले नाहीत तर त्या बियाणांतून निघणाऱ्या रोपट्यांच्या संवर्धनाची जबाबदारी ही त्यांनी उचलली. पुढे जे घडलं तो इतिहास आहे.
दारीपल्ली रामय्या च्या शब्दात सांगायचं झालं तर,
There is no proxy when it comes to praying to a God or planting a tree. You should do it all by yourself to get the benefit.
आपलं लक्ष्य ठरवताना ते म्हणतात,

Instead of giving fruit to a child, give them a plant. Let them nurture the plant into a tree and enjoy its fruits forever. This way, they learn to love nature. Today’s children are tomorrow’s citizens. Similarly, today’s plants are tomorrow’s trees.
त्यांचा हा प्रवास आजही अविरत सुरु आहे. आजवर त्यांनी एक कोटी पेक्षा जास्त झाडांची लागवड करून ह्या वसुंधरेला सुजलाम सुफलाम करण्याचं शिवधनुष्य आपल्या एकट्याच्या खांद्यावर लीलया पेललं आहे.
दारीपल्ली रामय्या ह्यांनी असं एक स्वप्न बघितलं ज्यातून त्यांचा काहीच फायदा नव्हता. पण मनात खोलवर त्या वसुंधरेला, निसर्गाला त्याचं वैभव पुन्हा एकदा प्राप्त करून देण्याची इच्छा होती.
गाठीशी पैसा नसताना पण अगदी आपल्या सध्या कृतीतून त्यांनी जगापुढे आदर्श निर्माण केला. त्यांच्या ह्या कार्याची नोंद भारत सरकारने २०१७ साली घेऊन त्यांचा गौरव पद्मश्री पुरस्काराने केला.
एक सैनिक ज्या प्रमाणे आपल्या मातृभूमीची रक्षा करण्याची जबाबदारी आपल्या हातात घेतो त्या प्रमाणे ह्या वसुंधरेला पुन्हा एकदा वृक्षवल्लीने बहरून टाकण्याची जबाबदारी घेतली.
ही जबाबदारी आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत सुरु राहिल असं म्हणत भारतात एका नव्या हरित क्रांतीची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या दारीपल्ली रामय्या ह्यांना माझा आजच्या पर्यावरण दिनी साष्टांग नमस्कार.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी किंवा तुमचे स्वतःचे लेखन मनाचेTalks वर प्रकाशित करण्याची इच्छा असल्यास येथे क्लिक करा.

'रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा
'रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा