गोष्टी ‘मनाला लावून न घेता’ मनःस्वास्थ्य सांभाळण्यासाठी हे करा!!

अकारण आपली मानसिक आणि शारीरिक शक्ती निगेटिव्ह गोष्टीत संपावण्यापेक्षा स्वतःसाठी आणि समाजास उपयोगी कामांसाठी वापरली तर क्या केहना..!!

मनावर घेऊ नका असे आपल्याला वारंवार ऐकून घ्यावे लागते का..?? मग हे उपाय करून पहा

मनावर घेणे ह्याचे दोन वेगवेगळे अर्थ आहेत. सकारात्मक मनावर घेणे आपल्या फायद्याचे असते.

म्हणजे वजन कमी करणे, चांगला अभ्यास करणे, वाईट सवयी सोडून देणे अशा कोणत्याही प्रकारात मोडणारे काम करण्यासाठी आपल्याला मनाचा हिय्या करून सुरुवात करावी लागते.

मला अमुक तमुक गोष्ट साध्य करायचीच आहे असे मनास ठासून सांगितले आणि ती गोष्ट पार पडली की सगळीकडे आपले कौतुकच होते.

पण जेव्हा आपण नकारात्मक रित्त्या कोणती गोष्ट मनावर घेतो तेव्हा काय होते माहीत आहे ना?

नकारात्मक मनावर घेणे हे नात्यांमध्ये किंवा कामाच्या ठिकाणी मोठा दुरावा आणण्यासाठी कारणीभूत ठरते.

म्हणजे कसे आहे ना बघा….

‘आपण’ म्हणजेच मनुष्यप्राणी हा एक सोशल प्राणी आहे. कुटुंबात, मित्रमंडळींच्या किंवा शेजाऱ्यांमध्ये रमणारा प्राणी.

भवताली माणसं हवीत नाहीतर आयुष्य किती निरस होऊन जाते. काही माणुसघाणी, एकलकोंडी माणसे ही असतात पण त्यांनाही काही विशिष्ट माणसे आजूबाजूला असण्याची सवय असतेच.

असो, मुख्य मुद्दा असा की आपला उठल्यापासून झोपेपर्यंत असंख्य माणसांशी संबंध येतो..

कोणाशी व्यवहाराचे नाते असते तर कोणाशी प्रेमाचे.. कोणी रोजच्या सवयीचा माणूस तर कोणी फारसा संबंध नसलेला.

अशा सगळ्यांशी आपले संवाद होत असतात. आपले हितसंबंध दृढ होत असतात.

आणि असे होत असताना कधी कधी कोणाकडून अकारण चार वाकडे बोल बोलले गेल्याने आपण मनाला लावून घेतो..

काही आगाऊ माणसे तयारच असतात जखमेवर मीठ चोळायला.. आम्ही आपले असेच सांगितले हो, तुम्ही मनावर घेऊ नका फारसे..!!

असे म्हणायला देखील कमी करत नाहीत.. मग आपण कितीही दुखावले गेलो तरी त्यांना फरक पडत नसतो.

असे अनुभव सगळ्यांनाच येतात. मग एक स्पर्धा सुरू होते.

एकदा का आपल्याला कोणी दुखावले की त्या माणसाचे प्रत्येक बोल आपण मनावर घेत राहतो. मग मनातले मांडे मनात खात राहतो.

ह्या सतत सततच्या नकारात्मक विचार करत राहण्याने आपण स्वतःला कोशात बांधून टाकतो आणि सरते शेवटी एखाद्या माणसाशी कायमचे संबंध तोडून टाकतो.

अर्थात काही ‘टॉक्सिक’ म्हणजेच विखारी माणसे आपल्यापासून जितकी लांब असतील तितके चांगलेच असते. मात्र आपल्या मनाला दुखवत आपण स्वतः तर एकलकोंडे होत नाही ना ह्या कडे लक्ष ठेवलेच पाहिजे.

दुसऱ्यांच्या बोलण्याचे स्वतःवर आपण परिणाम का करून घ्यावे..? का सगळ्या गोष्टी उगीच मनावर घ्याव्यात..?

का आपण स्वतःला उदास करावे..? तिकडे दुनिया धमाल करते आणि आपणच विनाकारण एकटे पडतो.

का अशी शिक्षा द्या स्वतःला..? बरं हे तर मनाचे खेळ असतात मग ह्याला आवर घालणेही आपल्या हातात असते. पण सगळ्यांना जमतेच असे नाही.

आता हे मनावर घेण्याचे साधारण प्रकार कसे असतात ते बघा…

१. एखाद्या नात्याची घनिष्टता, गेहराई: एखादे नाते घनिष्ट असल्यास छोटीशी गोष्टही मनावर लागण्याची शक्यता जास्ती असते.

जसे अत्यंत खास मैत्रिणीने स्पष्टपणे एखादी चूक दाखवून दिली, किंवा बायको बोलायच्या ओघात एखादी घटना बोलून गेली तर आपल्या मनाला ते इतके लागून राहते की सुटता सुटत नाही.

मात्र एखादी कमी परिचयाची व्यक्ती काहीही बोलल्यास आपल्याला फारसा फरक पडत नाही.

२. एखाद्या नात्यात आधीपासूनच ओलावा नसल्यास: जसे सासू सुनेचे नाते. एखाद्या नात्यात आधीपासूनच भांडणे होत असतील तर दर वेळी आपण तितक्याच मानसिकतेने त्या नात्याकडे पाहतो.

कुठलाही संबंध नसताना प्रत्येक वक्तव्याला आपल्याशीच जोडू पाहतो. आणि मग हे फ्रिक्शन वाढत जाऊन आपल्यात खूपच कटुता निर्माण करतो.

३. स्वाभिमान प्रत्येक सांभाषणाच्या आड येऊ लागल्यास: एखाद्या साध्या संभाषणात गरज नसताना आपला स्वाभिमान मध्ये येतो.

त्यामुळे सामोरची व्यक्ती आपल्या वर्मावरच बोट ठेवत आहे असे समजून आपण विनाकारण विसंवाद ओढवून घेतो.

अगदी हमारी तुमरीवर येतो आणि त्याचे पर्यावसान घमासान हाणामारीत सुद्धा होते. अशी छोटी मोठी लढाई तर आपण कित्येक वेळा पाहतोच नाही का..?

बरं आता यासाठी काय करता येईल?

खरे तर ह्या सगळ्या गोष्टींची काहीच गरज नसते. सगळ्या गोष्टी मनावर न घेताही आपण ह्यातून तोडगा काढू शकतो.

विक्षिप्त लोकांपासून दूर राहणे उत्तमच असते पण त्यासाठी दर वेळी भांडूनच दूर गेले पाहिजे असे नाही.. आणि ह्यात नुकसान आपलेच होते.

सतत मन अशांत होते, विचाराने भणभणते. सरतेशेवटी आपण एक उदास चिडचिडी आणि नकारात्मक व्यक्ती बनत जातो.

हे नक्कीच आपल्याला अपेक्षित नसते. जितके आपण शांत राहू तितकेच आपण कार्यक्षम राहतो.

म्हणून ह्या ‘मनाला लावून’ घेण्याच्या आपल्या सवयीला दूर करण्यासाठी काही सोप्पे उपाय करून तर पहा. बघा तुमचे मन:स्वास्थ्य कसे ठणठणीत राहते.

१. प्रत्येक गोष्ट आपल्यासाठीच असते हा विचार सोडा: एखादी व्यक्ती तुम्हाला कडवट बोलली असेल तर तो त्या व्यक्तीच्या वैयक्तिक आयुष्याचा भाग असतो.

त्या व्यक्तीच्या आयुष्यात आलेल्या अडचणींचा परिणाम असतो. वडाचे तेल वांग्यावर निघते ना ?? अगदी तसेच..

सहसा आपल्याशी दिलखुलास असणारी व्यक्ती काही अपशब्द बोललीच असेल तर मनावर घेऊ नका.

ते खरोखरीच तुमच्या साठी असेल असे नाही. मग जे तुमच्या साठी नव्हतेच त्याला मनात आणायचेच कशाला..!! थोडे समजुतीने घ्या..

२. हे नाते टिकवाचे आहे का तोडायचे हा विचार नक्की झाला पाहिजे: एखाद्या नात्यात कटुता निर्माण होत असल्यास जरा विचार करा.

हा समोरचा माणूस आपल्याला महत्वाचा आहे की नाही. जर त्या व्यक्तीशी अतूट नाते असेल तर मात्र आपल्या शब्दांवर लगाम लावा.

कधी कधी सत्य बोलण्यापेक्षा समोरच्याला समजून घेऊन काही गोष्टी सोडून देणे ह्यातच नात्याचे हीत असते.

रागाच्या भरात शब्दाने शब्द वाढत गेल्यास नात्यास तडा जाऊ शकतो. एखादी गोष्ट पटवून देण्यासाठी पुन्हा कधीतरी चर्चा होऊच शकते.

म्हणून रगात बोललेले मनावर घेत राहण्यापेक्षा योग्य वेळी आपले मुद्दे समोरच्यास समजावून द्या. शेवटी नात्यातला ओलावा टिकवणे महत्वाचे..!!

३. झालेल्या प्रसंगाला समोरच्याच्या नजरेतून पहा: कधी कधी प्रत्येक गोष्ट आपल्याच नजरेतून पाहिल्यास आपल्याला आपली चूक कधीच उमजत नाही.

मग समोरच्याचे बोलणे फक्त नकारात्मक पद्धतीने मनात घर करून राहते. आणि आपली प्रचंड चीड चीड होते. हे टाळण्यासाठी कधीतरी समोरच्या व्यक्तीच्या अँगलनेही घडलेल्या प्रसंगाकडे बघा..

कदाचित त्यावेळी आपल्याला आपले काय चुकले हे कळू शकेल. नंतरच्या मनःस्तापापेक्षा घडलेल्या प्रसंगातून शिकलेले कधीही चांगले. म्हणून म्हणतात ना ‘Put yourself into the other person’s shoes..’

४. आपल्याच माणसांना ‘अरे ला कारे’ करणे गरजेचे आहे का?: ‘Every action has an equal reaction’ असे आपण म्हणतो. ते योग्यहि आहे.

अनोळखी व्यक्तीला आपण एंटरटेन करणे योग्य नाहीच. तिथे ‘आली अंगावर तर घेतली शिंगावर’ असे करावेच लागते.

पण आपल्या सख्ख्या, जिवाभावाच्या लोकांबरोबर असे करणे कितपत योग्य आहे ह्याचा विचार जरूर व्हावा. कोणी अरे केल्यावर तात्काळ कारे करायची गरज आहे का..?

समोरच्याने अपमान केलाच तरी जरा मोठा श्वास घ्या. एक ते शंभर मोजा. आपल्या भावनांना यावर घाला. रागात बोललेला शब्द समोरच्याला अनंतकाळासाठी घायाळ करू शकतो हे ध्यानात ठेवा.

वातावरण निवळू द्या आणि मगच आपल्या अपमानाचा जाब विचारा.. सगळ्यांकडे आपल्यासारखे पेशन्स असतातच असे नाही.

मात्र आपण सबुरीने घेतले तर काही मिसअंडरस्टँडिंग चुटकी सरशी दूर होतात. एकमेकांशी थंड डोक्याने बोलून तर बघा, सगळे प्रॉब्लेम पटापट सुटतील आणि मन शांत होईल.

५. स्वतःची किंमत स्वतःच ठेवा: आपला मान आपल्यालाच ठेवावा लागतो. म्हणजे काही नाती आपण तोडू शकत नाही आणि त्यांना निभावू शकत नाही.

अशा वेळी अशा अवघड जागेचे दुखणे असलेली माणसे आपल्याला सतत भंडावून सोडू शकतात. अशांच्या नादी लागून आपलं मनःस्वास्थ्य बिघडवण्यापेक्षा त्यांना दुर्लक्षित केलेले कधीही चांगले.

मग ते आपल्या पाठीमागे काहीही बोलो. ते पाहणे आपले काम नाही. त्याना स्वतःच्या मनात घर करू देऊ नका. त्यांच्यापासून आपला मान आणि मन दोन्हीही जपून ठेवा.

काहीही झाले तरी आपण भवतालच्या माणसांशिवाय राहू शकत नाही. नाहीतर जंगलात, निर्मनुष्य ठिकाणीच जाऊन राहावे लागेल.

ते तर केवळ अशक्यच आहे.. त्यामुळे लोक काय म्हणतील, कोण आपल्याशी कसे बोलतो ह्याला जास्ती महत्व देण्यापेक्षा ज्यांच्याशी आपले नाते सुंदर जुळते अशा लोकांच्या कंपनीत राहिलेले उत्तम.

ह्याने आपले जग सुंदर बनते. आपले प्रिय दोस्तमंडळी, नातेवाईक आपल्या सोबत हवेच. आणि त्यांचीही मने आपल्यामुळे दुखावली जाणार नाहीत ही जबाबदारी आपण देखील घेतली पाहिजे.

ह्यांच्या शिवाय आपल्या जीवनाला शोभा नाही.

असे असले तरीही काही गोष्टी, भावना, निर्णय हे आपले स्वतःचे असतात आणि ते आपल्यापुरतेच ठेवले गेले पाहिजेत.

अकारण आपली मानसिक आणि शारीरिक शक्ती निगेटिव्ह गोष्टीत संपावण्यापेक्षा इतर स्वतःसाठी आणि समाजास उपयोगी कामांसाठी वापरली तर क्या केहना..!!

असे संतुलित जगले तर आयुष्य अत्यंत सुंदर आहे… हो ना..!?

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठीयेथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

7 thoughts on “गोष्टी ‘मनाला लावून न घेता’ मनःस्वास्थ्य सांभाळण्यासाठी हे करा!!”

  1. सुंदर… बहुतेक प्रत्येक जण असे अनुभव घेतचं असतात

    Reply
    • खुप छान, सुरेख शिकवण. मनःपूर्वक धन्यवाद.

      Reply
  2. खुप सुरेख माहिती दिली आहे ज्यामुळे भविष्यात असे प्रसंग, घटना यदा कदाचित आल्याच तर त्याला सामोरं जाण्याचं बळ, परिस्तिथीला तोंड देण्यासाठी, नातं टिकून राहण्यासाठी नक्कीच उपयोगी होईल असं माझं मत आहे.
    मनाचे talks टीम चे मनापासून धन्यवाद आणि अशा समाजउपयोगी, लोकहितासाठी आपलं हे कार्य खुप योगदान देत.

    Reply

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय